Tuesday, July 28, 2026

Jaykumar Gore : दिल्लीत कोण जाणार हे ठरवण्याचा अधिकार भरत गोगावलेंना नाही; मंत्री जयकुमार गोरे यांनी टोचले कान

Jaykumar Gore : दिल्लीत कोण जाणार हे ठरवण्याचा अधिकार भरत गोगावलेंना नाही; मंत्री जयकुमार गोरे यांनी टोचले कान

मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी जबाबदारीने बोलण्याचा सल्ला

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांवरून दावे प्रतिदावे सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जावे आणि एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा खुद्द मंत्री भरत गोगावले यांनी केल्याने चर्चांना उधाण आले. मात्र, भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी गोगावलेंच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला असून, "दिल्लीत कोण जाणार आणि राज्यात कोण राहणार हे ठरवण्याचा अधिकार भरत गोगावलेंना नाही, मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी जबाबदारीने बोलले पाहिजे," अशा शब्दांत गोगावलेंचे कान टोचले आहेत.

सोलापूर येथे पत्रकारांशी बोलताना जयकुमार गोरे यांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांना अनावधानाने किंवा जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या वक्तव्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यात अत्यंत उत्तम काम करत असून राज्यातील निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेले यश ही त्यांच्याच नेतृत्वाची पोचपावती आहे. फडणवीस यांनी स्वतः आपण महाराष्ट्रातच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सहकारी पक्षातील नेत्यांनी कोणाच्या स्थानाबाबत भाष्य करताना आपल्या मर्यादांचे भान ठेवले पाहिजे, असे गोरे यांनी सांगितले.

एमपीएससी पेपरफुटीच्या मुद्द्यावरून आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांचाही गोरे यांनी समाचार घेतला. माझ्या माहितीनुसार कोणताही पेपर फुटलेला नाही, रोहित पवारांचे एमपीएससी सेंटर कदाचित वेगळे असावे, असा टोला त्यांनी लगावला. धाराशिव जिल्हा परिषदेच्या उपक्रमावरून सुरू असलेल्या वादावर बोलताना, चांगल्या प्रकल्पांमध्ये राजकीय उणीवा शोधण्याऐवजी कामाच्या दर्जाकडे लक्ष दिले पाहिजे, असे ते म्हणाले.

गडकरींवरील आरोपांना दिले उत्तर

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावरील टीकेला उत्तर देताना गोरे म्हणाले की, आज सत्ताधारी आणि विरोधक ज्या रस्त्यांवरून फिरत आहेत, ते गडकरींमुळेच शक्य झाले आहे. सर्वोत्कृष्ट कामांना बदनाम करण्याची प्रथा विरोधकांनी सुरू केली आहे. दरम्यान, उजनी धरण ९७ टक्के भरल्याने भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणेच दिवसातील आठ तास नियमित वीजपुरवठा केला जाईल, असा दिलासाही त्यांनी या वेळी दिला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >