Monday, July 27, 2026

DCM Eknath Shinde : सैनिक कल्याणासाठी सरकार कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

DCM Eknath Shinde : सैनिक कल्याणासाठी सरकार कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कारगिलच्या शौर्याला अभिवादन; ऑपरेशन सिंदूर, वन रँक वन पेन्शनसह केंद्राच्या निर्णयांचे कौतुक

कारगिल वॉर मेमोरियलसाठी ३ कोटींच्या लाईट अँड साऊंड शोची घोषणा, वीर कुटुंबांच्या पाठीशी वर्षातील ३६५ दिवस उभे राहण्याची ग्वाही

मुंबई : कारगिल (Kargil) विजय हा केवळ युद्धातील यशाचा उत्सव नसून भारतीय जवानांच्या अतुलनीय शौर्य, सर्वोच्च बलिदान, समर्पण आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहे. या शौर्यगाथेमागे उभ्या असलेल्या वीरमाता आणि वीरपत्नींचा सन्मान म्हणजे संपूर्ण राष्ट्राने व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. राज्य सरकार सैनिक, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी कायम ठामपणे उभे असून सैनिक कल्याणासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी केले.

लोकभवन, मुंबई येथे कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित वीरसैनिक व वीरपत्नी कृतज्ञता सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राज्यपाल विष्णूदेव शर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, पर्यटन व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई, व्हाईस अॅडमिरल संजय वातसायन, लेफ्टनंट जनरल धीरेंद्र सिंह कुशवाह, तिन्ही दलांचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती तसेच वीरसैनिक, वीरमाता, वीरपत्नी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, २६ जुलै हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे. प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जवानांनी कारगिलमध्ये मिळवलेला विजय हा भारतीय सैन्याच्या अदम्य शौर्य, त्याग आणि राष्ट्रभक्तीचे जिवंत उदाहरण आहे. कारगिल विजयाचा आनंद साजरा करताना ५२७ वीर जवानांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या प्रत्येक जवानाने भारतीयांच्या मनात राष्ट्रभक्तीची अखंड ज्योत प्रज्वलित केली. तसेच वीरमाता आणि वीरपत्नींचा त्याग हा देशाचा खरा स्वाभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले.

"आजचा हा सन्मान केवळ व्यक्तींचा नाही, तर त्याग, धैर्य, संघर्ष आणि राष्ट्रनिष्ठेचा आहे. फक्त आजच नव्हे, तर वर्षातील ३६५ दिवस संपूर्ण देश तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे," अशी ग्वाही त्यांनी दिली. कारगिलच्या शौर्यगाथा पुढील पिढ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी कारगिल वॉर मेमोरियल येथे ३ कोटी रुपयांच्या खर्चातून लाईट अँड साऊंड शो उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. भारत शांततेचा पुरस्कर्ता असला तरी देशाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्यांना भारतीय सेना सक्षमपणे उत्तर देण्यास समर्थ असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सैनिक कल्याणासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांचे कौतुक करताना त्यांनी वन रँक, वन पेन्शन योजनेची अंमलबजावणी, निमलष्करी दलांसाठी विविध कल्याणकारी योजना तसेच महिलांना लष्करात कायमस्वरूपी कमिशन आणि नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून दिल्याचा उल्लेख केला.

"सीमेवर जवान प्राणांची बाजी लावत असल्यामुळे देश सुरक्षित आहे. मात्र त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या वीरमाता आणि वीरपत्नींच्या त्यागामुळेही देश अधिक सक्षम झाला आहे. त्यांच्या योगदानाबद्दल राष्ट्र सदैव कृतज्ञ राहील," अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >