Sunday, July 19, 2026

Jammu and Kashmir Flood : जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा कहर; 8 जणांचा मृत्यू, 6 बेपत्ता; अमरनाथ-वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित

Jammu and Kashmir Flood : जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा कहर; 8 जणांचा मृत्यू, 6 बेपत्ता; अमरनाथ-वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली. पुंछ आणि राजौरी जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला असून अचानक आलेला पूर, भूस्खलन आणि घर कोसळण्याच्या घटनांमध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 6 जण बेपत्ता आहेत. शेकडो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. (Jammu kashmir)

भारतीय हवामान विभागाने 23 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अमरनाथ यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा आणि शिवखोड़ी यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे.पुंछ जिल्ह्यातील सुरनकोट आणि हवेली परिसरात सर्वाधिक नुकसान झाले. सुरनकोटच्या लोअर मुर्रा गावात भूस्खलनामुळे एक घर मलब्याखाली दबले. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून महिला आणि लहान मुलांसह 6 जण अद्याप बेपत्ता आहेत. बचाव पथके शोधमोहीम राबवत आहेत. नूनाबांडी गावात घर कोसळून 28 वर्षीय नाजिया कौसर यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती आणि तीन लहान मुले जखमी झाली. संगलेयानी गावातही घर कोसळून एका युवकाचा मृत्यू झाला. मरहोट परिसरात एक अल्पवयीन मुलगी पुराच्या पाण्यात वाहून गेली, तर धुंधक लाथुंग पुलाजवळ एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. (Weather Update)

पुंछ शहरात पुलस्त्य नदीला आलेल्या पुरामुळे (Flood) दोन दुकाने, एक पिठाची गिरणी आणि वाहन सेवा केंद्र वाहून गेले. अनेक वाहनेही पुराच्या पाण्यात अडकली. भूस्खलनामुळे (landslide) अनेक रस्ते बंद झाले असून वीजपुरवठा तसेच बीएसएनएल आणि एअरटेलच्या सेवा विस्कळीत झाल्या आहेत.राजौरी शहरात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसानंतर रविवारी सकाळी अचानक पूर आला. दरहाली, खांडली, सुकतोह आणि जमोला नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. दरहाली नदीने बेला कॉलनीजवळील संरक्षण भिंत फोडल्याने नवीन बसस्थानकात पाणी शिरले. अनेक वाहने वाहून गेली किंवा पाण्यात बुडाली. अब्दुल्ला ब्रिज परिसरातील झोपडपट्टीतील 50 हून अधिक कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

जिल्हा प्रशासन, पोलीस, सेना, एसडीआरएफ आणि स्थानिक स्वयंसेवक संयुक्तपणे बचाव आणि मदतकार्य करत आहेत. राजौरीतील सरकारी बॉईज हायर सेकंडरी स्कूलमध्ये तात्पुरते पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आले आहे. जम्मूमध्ये तवी नदीची पाणीपातळी अचानक वाढल्याने तीन युवक नदीच्या मध्यभागी अडकले. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. रामबन जिल्ह्यातील बनिहाल येथे एक आल्टो कार खोल दरीत कोसळून गुलाम मोहम्मद लोन यांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. गंदरबल जिल्ह्यात रंगा मोड आणि जोजिला दरम्यान किरकोळ भूस्खलन झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. (Rescue Operation)

कुपवाडा प्रशासनाने 19 ते 23 जुलैदरम्यान अतिवृष्टीचा इशारा देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.हवामान सुधारल्यानंतर आणि मार्गांची सुरक्षितता तपासल्यानंतरच अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. यंदा 3 जुलैपासून सुरू झालेल्या 57 दिवसीय यात्रेत आतापर्यंत 3.76 लाखांहून अधिक भाविकांनी बाबा बर्फानींचे दर्शन घेतले आहे.कटरा प्रशासनाने मान्सून आपत्ती व्यवस्थापनासाठी 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष सुरू केला असून नागरिकांना अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत 01991-295681 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. (Flood Update)

उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनीही राजौरी आणि पुंछ येथील परिस्थितीचा आढावा घेत तातडीने मदत व पुनर्वसन कार्य गतीने राबविण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासनाने नागरिकांना नद्या, नाले आणि भूस्खलनप्रवण भागांपासून दूर राहण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि केवळ अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. पोलीस, सेना, एसडीआरएफ आणि एनडीआरएफची पथके युद्धपातळीवर मदत व बचावकार्य करत आहेत. (Rain)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >