Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी, १२ जणांचा मृत्यू; ६ बेपत्ता, वैष्णोदेवी व अमरनाथ यात्रा स्थगित

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांत शनिवारी रात्री झालेल्या ढगफुटीने भीषण रूप धारण केले असून, अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून सहा जण बेपत्ता आहेत. बचाव पथकांनी शोधमोहीम तीव्र केली असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या २४ तासांत पूंछमध्ये ७७ मिमी, तर राजौरीमध्ये १०३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पीर पंजाल भागातील अनेक निवासी क्षेत्रे पाण्याखाली गेली असून, राजौरी जिल्ह्यातील बेला कॉलनीमध्ये घरे, गाड्या आणि पायाभूत सुविधा पुराच्या प्रवाहाने वाहून गेल्या आहेत. राजौरी आणि पूंछमधील दुर्गम भागातही जीवितहानी झाली आहे. कोट्यवधी रुपयांचे शेतीचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले असून, संपूर्ण परिसरात प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेतला जात आहे.(Jammu and Kashmir)



सरकारी हालचाली


परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी संबंधित जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांशी चर्चा करून बाधित कुटुंबांना तातडीने मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही उपराज्यपाल आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी संपर्क साधून केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, दिल्ली येथे नियोजित आंदोलनासाठी गेलेले मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, ते तातडीने जम्मूमध्ये परतणार आहेत. "पाऊस आणि पुरामुळे नुकसान झालेल्यांना मदत करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल," अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच, फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नियोजित आंदोलन आपल्या वेळापत्रकानुसार सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.



धार्मिक यात्रा स्थगित


हवामान खात्याने वर्तवलेल्या अतिवृष्टीच्या इशार्यानंतर, प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून श्री अमरनाथ यात्रेनंतर आता 'श्री माता वैष्णोदेवी' तीर्थयात्राही तात्पुरती स्थगित केली आहे. श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय घेतला आहे. पहलगाम आणि बालटाल मार्गावर दरड कोसळण्याचा धोका असल्याने अमरनाथ यात्राही थांबवण्यात आली आहे. हवामानात सुधारणा होऊन परिस्थिती सुरक्षित झाल्याशिवाय या दोन्ही यात्रा सुरू केल्या जाणार नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Vaishno Devi)



हवामान विभागाचा इशारा


भारतीय हवामान विभागाने १९ ते २३ जुलै या पाच दिवसांच्या कालावधीत जम्मू-काश्मीरमध्ये खराब हवामानाचा इशारा दिला आहे. पीर पंजाल पर्वतरांग, अनंतनाग, पहलगाम, कुलगाम, शोपियान, गुलमर्ग आणि सोनमर्ग-झोझिला मार्गासह अनेक ठिकाणी भूस्खलन, चिखलाचे लोट आणि दरडी कोसळण्याची शक्यता आहे. या हवामान स्थितीचा परिणाम जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गासह प्रमुख रस्त्यांच्या दळणवळणावर होऊ शकतो. सध्यातरी महामार्ग वाहतुकीसाठी खुला असला तरी, प्रशासनाने पर्यटकांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नद्या आणि ओढ्यांजवळ जाणे टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या असून हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास नुकसानीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. प्रशासन, पोलीस आणि बचाव पथके युद्धपातळीवर मदतकार्य राबवत असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे.

Comments
Add Comment

Weather Update : मंगळवारी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : उद्या म्हणजेच मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज

Minister Rajnath Singh : ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ उत्साहात संपन्न; दिल्लीत ८०० शिवसैनिकांचे ‘महारक्तदान’; संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून रक्तवीरांचा गौरव

- सैनिकांसाठी महाराष्ट्रातून १६ हजार जणांची नोंदणी नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम आणि

DRDO Kaveri 2.0 : अमेरिकेच्या इंजिन विलंबाला भारताचा ‘स्वदेशी’ मास्टरस्ट्रोक! तेजस Mk1A साठी DRDOचा कावेरी 2.0 तयार; IAFची मोठी चिंता दूर होणार

नवी दिल्ली : भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजस Mk1Aच्या उत्पादनाला अमेरिकन GE F404 इंजिनांच्या विलंबामुळे अडथळे

Rajnath Singh : ‘रक्तदान करणारे योद्धे’, राजनाथ सिंहांकडून महाराष्ट्रातील रक्तदात्यांचे कौतुक!

नवी दिल्ली : देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांसाठी रक्तदान करणाऱ्या महाराष्ट्रातील रक्तदाते योद्धे आहेत,

Indian fishermen in Pakistan : पाकिस्तानच्या तुरुंगात १९८ भारतीय मच्छीमार अद्याप बंदिस्त

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तानच्या समुद्रसीमेवर मासेमारी करताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याच्या आरोपावरून

Jharkhand Exam Scam : झारखंडमध्ये परीक्षांमधील अनियमिततेवर तिढा कायम

नवी दिल्ली : झारखंडमध्ये परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेला वाद आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन