Monday, July 20, 2026

Nagaland Landslide : नागालँडमध्ये दरड कोसळून ८ जणांचा मृत्यू, १२ जखमी; बचावकार्य सुरू

Nagaland Landslide : नागालँडमध्ये दरड कोसळून ८ जणांचा मृत्यू, १२ जखमी; बचावकार्य सुरू

मोन : नागालँडमधील मोन जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या दरड कोसळण्याच्या अनेक भीषण घटनांमध्ये किमान ८ जणांचा मृत्यू झाला असून, १२ जण जखमी झाले आहेत. सततच्या मुसळधार पावसामुळे ही परिस्थिती उद्भवली असून, जिल्हा प्रशासन आणि बचाव पथकांनी शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू ठेवली आहे.(Nagaland Landslide)

मोन जिल्ह्याचे उपायुक्त वेन्येई कोन्याक यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात रविवारी पहाटे १ वाजेपासून पावसाचा जोर वाढला होता. त्यानंतर सकाळी ६ ते ७ च्या सुमारास विविध ठिकाणी दरडी कोसळल्याच्या बातम्या मिळाल्या. मोन शहर आणि तिझित हे भाग या दुर्घटनेत सर्वाधिक बाधित झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांपैकी आतापर्यंत ४ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, इतर ४ जणांचा शोध सुरू आहे. यामध्ये ३ महिला आणि १ पुरुषाचा समावेश आहे. सध्या एसडीआरएफ , पोलीस, आसाम रायफल्स, एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिक मिळून बचावकार्य करत आहेत. दरड कोसळल्यामुळे अनेक घरांचे मोठे नुकसान झाले असून, रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.(Nagaland News)

नेत्यांकडून दुःख व्यक्त

भारतीय जनता पक्षाचे नागालँड प्रदेशाध्यक्ष बेंजामिन येपथॉमी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांप्रती संवेदना व्यक्त करत जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली. तसेच, बचाव पथके, जिल्हा प्रशासन, वैद्यकीय कर्मचारी आणि स्वयंसेवक ज्या पद्धतीने या कठीण काळात सेवा देत आहेत, त्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.नागालँडमध्ये केवळ मोनच नाही, तर मोकोकचुंग जिल्ह्यातील 'तुली' भागातही दरडी कोसळल्यामुळे अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीचा हा फटका नागालँडमधील जनजीवनावर गंभीर परिणाम करणारा ठरला असून, प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.

उत्तर बंगाल आणि सिक्कीममध्ये पूरस्थिती

उत्तर बंगाल आणि शेजारील सिक्कीममध्ये गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दार्जिलिंग, जलपाईगुडी, कालिम्पोंग आणि अलीपूरद्वारसह सिक्कीमच्या प्रमुख जिल्ह्यांत पावसाने थैमान घातले आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तासांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करत काही ठिकाणी २०० मिमीपेक्षा अधिक पावसाचा इशारा दिला आहे. सततच्या पावसामुळे दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच असून, सिक्कीम आणि बंगालला जोडणारा महत्त्वाचा ‘राष्ट्रीय महामार्ग १०’ आधीच दरडींमुळे बाधित झाला होता, त्यात पावसाच्या व्यत्ययामुळे दुरुस्तीच्या कामात मोठा अडथळा येत आहे. रस्त्यांवर दरडी आणि सैल दगड पडत असल्याने दळणवळण ठप्प झाले आहे. या खराब हवामानाचा फटका पिके आणि फलोत्पादनालाही बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दृश्यमानता कमी झाल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आणि वीज कोसळण्याची शक्यता असल्याने मोकळ्या जागेत न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मुसळधार पावसाच्या या अंदाजामुळे दोन्ही राज्यांत यंत्रणा सतर्क झाली असून, परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >