Tuesday, July 14, 2026

Hormuz Strait Attack : होर्मुझ हल्ल्यात भारतीय नाविकाच्या मृत्यूनंतर भारताने इराणी दूतावासाला बजावले समन्स

Hormuz Strait Attack : होर्मुझ हल्ल्यात भारतीय नाविकाच्या मृत्यूनंतर भारताने इराणी दूतावासाला बजावले समन्स
नवी दिल्ली : इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीत संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) तेलवाहू जहाजांवर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नाविकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर भारत सरकारने कठोर पाऊल उचलत नवी दिल्लीतील इराणी दूतावासाला समन्स बजावून स्पष्टीकरण मागितले आहे. ( Iran News) भारताच्या या कारवाईनंतर इराणचे राजनैतिक अधिकारी परराष्ट्र मंत्रालयात हजर झाले. यामध्ये इराणचे डेप्युटी चीफ ऑफ मिशन (डीसीएम) मोहम्मद जवाद हुसेनी यांचाही समावेश होता. भारतीय अधिकाऱ्यांनी समुद्रात काम करणाऱ्या मोठ्या भारतीय समुदायाच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. या परिसरात हजारो भारतीय नागरिक व्यापारी जहाजांवर कार्यरत असून ते अनेकदा अत्यंत धोकादायक समुद्री मार्गांवर काम करतात. इराणने यूएईच्या ‘मोम्बासा’ या तेलवाहू जहाजावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर अन्य आठ जण जखमी झाले. जखमींमध्ये सहा भारतीय आणि दोन युक्रेनियन नागरिकांचा समावेश आहे. त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. ( India Iran Relations)
हल्ल्यानंतर दोन्ही जहाजांना आग लागली होती. मात्र, नंतर ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले. संयुक्त अरब अमिरातीने या हल्ल्याचा तीव्र निषेध करत त्याला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उघड उल्लंघन म्हटले आहे. तसेच अशा प्रकारच्या कारवाया प्रादेशिक सुरक्षेसाठी गंभीर धोका असल्याचे यूएईने नमूद केले.यूएईने आपल्या निवेदनात म्हटले आहे, “तणाव वाढविणाऱ्या अशा कारवायांना योग्य प्रत्युत्तर देण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे.” ही घटना इराण आणि त्याच्या शेजारील देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर घडली आहे. होर्मुझ सामुद्रधुनी हा या संघर्षाचा अत्यंत संवेदनशील केंद्रबिंदू बनला आहे. जगातील सुमारे पाचव्या भागाचे तेल निर्यात होणारा हा अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग मानला जातो.ओमानच्या सागरी हद्दीत झालेल्या या हल्ल्यामुळे पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढला असून होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या व्यापारी जहाजांच्या वाहतुकीवरील धोकेही वाढले आहेत. ( Hormuz Strait Attack)
यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने हल्ल्यानंतर जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, लक्ष्य करण्यात आलेल्या जहाजांमध्ये ‘मोम्बासा’ हा तेलवाहू टँकर आणि ‘अल बहिया’ हे द्रवीकृत नैसर्गिक वायू (LNG) वाहून नेणारे जहाज होते. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, दक्षिणेकडील सागरी मार्गातून प्रवास करत असताना या दोन्ही जहाजांवर इराणी क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >