Monday, August 3, 2026

NEET UG Counselling 2026 : नीट यूजी काऊन्सिलिंगचे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेपासून सुरू होणार नोंदणी प्रक्रिया!

NEET UG Counselling 2026 : नीट यूजी काऊन्सिलिंगचे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेपासून सुरू होणार नोंदणी प्रक्रिया!

नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशाची वाट पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मेडिकल काऊन्सिलिंग कमिटी (MCC) ने 'नीट यूजी २०२६' (NEET UG 2026) च्या समुपदेशन प्रक्रियेचे (Counselling Schedule) अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. एमसीसीने जाहीर केलेल्या या कार्यक्रमानुसार पहिल्या फेरीसाठीची ऑनलाइन नोंदणी ५ ऑगस्ट २०२६ पासून सुरू होणार आहे. तसेच या पहिल्या फेरीत विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी १२ ऑगस्ट २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. ही काऊन्सिलिंग प्रक्रिया देशातील १५ टक्के ऑल इंडिया कोटा (All India Quotas) आणि एमसीसीच्या अखत्यारीत येणाऱ्या इतर संस्थांमधील एमबीबीएस (MBBS), बीडीएस (BDS) आणि बी.एससी. नर्सिंग (B.Sc. Nursing) या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित केली जात आहे.

पेपरफुटीचे सावट, फेरपरीक्षा आणि निकालाचा प्रवास

यंदाची नीट परीक्षा अत्यंत वादग्रस्त आणि संघर्षाची ठरली. ३ मे २०२६ रोजी पार पडलेली मूळ परीक्षा पेपर फुटीच्या गंभीर आरोपांमुळे रद्द करावी लागली होती. त्यानंतर २१ जून २०२६ रोजी ही फेरपरीक्षा पुन्हा घेण्यात आली. फेरपरीक्षेनंतर १६ जुलै २०२६ रोजी NEET UG 2026 चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत देशभरातून एकूण ११.२१ लाख उमेदवार पात्र ठरले आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत असल्याने विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे.

पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचा मनस्ताप आणि राजकीय वादळ

नीट पेपर फुटीच्या या प्रकरणामुळे देशभरातील जवळपास २२ लाख विद्यार्थ्यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. या तणावापोटी दुर्दैवाने २२ विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण देश सुन्न झाला होता. या मुद्द्यावरून राजकीय वातावरणही चांगलेच तापले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजस्थानमध्ये विद्यार्थ्यांचे मोठे मेळावे घेऊन केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. दरम्यानच्या काळात, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी केलेल्या एका मार्मिक टिप्पणीवरून परदेशात असलेल्या अभिजित दीपके या तरुणाने सोशल मीडियावर 'कॉक्रोच जनता पार्टी' नावाचा प्लॅटफॉर्म तयार केला. त्यानंतर दीपके यांनी नीट पेपर फुटीचा हा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर लावून धरला.

आंदोलनाचा भडका आणि सीबीआय कारवाईत महाराष्ट्राचे कनेक्शन

या मुद्द्यावरून दिल्लीतील जंतरमंतर येथे पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक यांनी प्रदीर्घ उपोषण केले. प्रकृती बिघडल्याने पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले तरीही आंदोलन थांबले नाही. २० जुलै रोजी अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली संसदेवर मोर्चा काढण्यात आला, ज्यावर पोलिसांनी लाठीमार केल्याने हे आंदोलन अधिकच चिघळले. दुसरीकडे, या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआय (CBI) करत असून आतापर्यंत डझनाहून अधिक आरोपींना अटक करण्यात आली आहे. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपींपैकी सर्वाधिक म्हणजेच ८ आरोपी हे महाराष्ट्रातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >