Monday, July 13, 2026

Ahilyanagar : हॉटेल व्यावसायिक प्रकरणानंतर व्यापारांचा एल्गार! सलग दुसऱ्या दिवशी शहर कडकडीत बंद

Ahilyanagar : हॉटेल व्यावसायिक प्रकरणानंतर व्यापारांचा एल्गार! सलग दुसऱ्या दिवशी शहर कडकडीत बंद

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर (Shrirampur) शहरात गुन्हेगारांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. गेल्या अकरा दिवसात चार जणांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. अवघ्या ११ दिवसांत प्राणघातक हल्ल्याच्या तब्बल चार घटना घडल्याने आधीच दहशतीत असलेल्या श्रीरामपूरकरांच्या संयमाचा बांध अखेर शनिवारी भरदुपारी फुटला. एका तरुण हॉटेल व्यावसायिकाची भरदिवसा झालेल्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण शहर हादरले असून, या गुंडशाहीविरोधात व्यापारी, सामाजिक संघटना आणि सर्वपक्षीय नेत्यांनी ‘बेमुदत बंद' पुकारला आहे. ( Shrirampur Crime News )

नेमकं काय घडलं ?

शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास नेवासा रस्त्यावरील ‘हॉटेल लक्ष्मीनारायण अँड लॉजिंग’ येथे ३४ वर्षांचे हॉटेल व्यावसायिक आकाश शेखर दुबय्या यांची हत्या करण्यात आली. हॉटेल व्यावसायिक आकाश शेखर दुबय्या हे आपल्या व्यवसायात व्यस्त होते. माहितीनुसार, तिथे आलेल्या तिघा मद्यधुंद तरुणांनी अत्यंत किरकोळ कारणावरून आकाश यांच्याशी वाद घातला. त्यांच्यातील शाब्दिक वाद इतका विकोपाला गेला की, त्या आरोपींनी सर्रासपणे धारदार शस्त्राने आकाश यांच्यावर सपासप वार करत त्यांची निर्घृण हत्या केली. भरदिवसा झालेल्या या थरारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ( Shrirampur Crime News )

संतप्त नागरिकांची पोलीस स्टेशनमध्ये घोषणाबाजी

गेल्या अकरा दिवसात चार जणांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या घटना शहरात घडल्याने रविवारी संपूर्ण श्रीरामपूर शहरात तीव्र रोषाचा ज्वालामुखी फाटला. संतापलेले नागरिक, व्यापारी आणि दुबय्या परिवाराने थेट आकाश यांचा मृतदेह श्रीरामपूर पोलीस ठाण्यासमोर आणून ठेवला. “शहरातील रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांवर आणि अवैध धंदेवाल्यांवर जोपर्यंत ‘मोक्का’ (MCOCA) कायद्यान्वये कठोर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,” अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली. संतप्त आंदोलकर्त्यांनी यावेळी गुन्हेगारी आणि पोलिसांच्या ढिसाळ कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ( Shrirampur Crime News )

बेमुदत बंदचा आज दुसरा दिवस

या हत्याकांडाच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी बेमुदत बंद पुकारला. या बेमुदत बंदचा आज दुसरा दिवस असून शहरातील मुख्य बाजारपेठ, कापड बाजार, किराणा दुकाने, भाजीमंडी आणि वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प होती. शहरात वाढलेले अवैध धंदे, मद्यपींचा सुळसुळाट आणि भाईगिरी यामुळे सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संपूर्ण श्रीरामपुरात कमालीची तणावपूर्ण शांतता पसरली आहे. पोलिसांच्या पुढील कारवाईकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >