Monday, July 13, 2026

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेचा टी२० पराभवाशी संबंध नाही; २०२७ वर्ल्ड कपसाठी गिलची रणनीती स्पष्ट

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेचा टी२० पराभवाशी संबंध नाही; २०२७ वर्ल्ड कपसाठी गिलची रणनीती स्पष्ट

बर्मिंगहॅम: भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर असून, उद्या १४ जुलैपासून दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होत आहे. टी२० मालिकेत इंग्लंडकडून ०-४ असा पराभव पत्करावा लागल्यानंतर, आता भारतीय संघ वनडे मालिकेत कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय वनडे संघाचा कर्णधार शुभमन गिलने पत्रकार परिषदेत मालिकेचे महत्त्व आणि २०२७ च्या वर्ल्ड कपसाठीच्या योजनांवर सविस्तर भाष्य केले आहे.

'टी२० पराभवाचा वनडेवर परिणाम नाही'

टी२० मालिकेतील खराब निकालाचा वनडे मालिकेवर काही परिणाम होईल का, या प्रश्नावर गिलने स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. तो म्हणाला, "मला वाटत नाही की त्याचा फार काही परिणाम होईल. हा क्रिकेटचा एक वेगळा प्रकार आहे, संघ वेगळा आहे आणि उद्दिष्टेही वेगळी आहेत. या फॉरमॅटमधील वातावरण आणि खेळाडूंच्या भावना टी२० पेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत."

२०२७ वर्ल्ड कपवर गिल आणि कोहलीचे लक्ष

ही मालिका २०२७ च्या वर्ल्ड कपच्या तयारीसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे गिलने नमूद केले. तो म्हणाला की, वर्ल्ड कपसाठी तयारीची आमची रणनीती पूर्णपणे वेगळी आहे. संघात कोणत्या प्रकारचे संतुलन (Combination) असावे, भविष्यात कोणत्या खेळाडूंची मदत होऊ शकते, याबाबत आपण विराट कोहलीशी सविस्तर चर्चा केल्याचे गिलने सांगितले.

गिल पुढे म्हणाला, "आम्ही संघात कोणत्या गोलंदाजांना, अष्टपैलू खेळाडूंना आणि फिरकीपटूंना संधी देता येईल, यावर विचार करत आहोत. दक्षिण आफ्रिकेतील (२०२७ वर्ल्ड कपचे यजमान) खेळपट्ट्या जशा असतील, तशीच परिस्थिती येथे मिळणार आहे, त्यामुळे या मालिकेचा सराव आमच्यासाठी खूप मोलाचा आहे. आमची प्लेइंग इलेव्हन स्थिर असली, तरी नवीन खेळाडूंनाही संधी देणे आवश्यक आहे. त्यांना दबावाखाली खेळण्याचा अनुभव मिळाल्यास वर्ल्ड कपपूर्वी संघ अधिक बळकट होईल."

विराट आणि रोहित संघाचा कणा

हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी यांच्या दुखापतीमुळे योजनांमध्ये काही प्रमाणात अडथळा आल्याचे गिलने मान्य केले. मात्र, तरीही संघाच्या कामगिरीबद्दल तो सकारात्मक दिसला. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याबद्दल बोलताना गिलने म्हटले की, "गेल्या दशकापासून विराट आणि रोहित भारतीय फलंदाजीचा कणा राहिले आहेत. ते आमच्या संघाचा अविभाज्य भाग असून, त्यांचा अनुभव आणि कौशल्य टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे."

मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला सामना: १४ जुलै, बर्मिंगहॅम

  • दुसरा सामना: १६ जुलै, कार्डिफ

  • तिसरा सामना: १९ जुलै, लॉर्ड्स

विराट कोहलीच्या दुखापतीनंतरच्या पुनरागमनामुळे आणि २०२७ च्या वर्ल्ड कपच्या दृष्टीने नव्या खेळाडूंना मिळणाऱ्या संधींमुळे या वनडे मालिकेकडे सर्वांचेच विशेष लक्ष असणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >