Thursday, July 9, 2026

Pavitra Rishta : 63 व्या वर्षीही अविवाहित, 'पवित्र रिश्ता' फेम 'ही' अभिनेत्री; सांगितलं लग्न न करण्यामागचं खरं कारण

Pavitra Rishta : 63 व्या वर्षीही अविवाहित, 'पवित्र रिश्ता' फेम 'ही' अभिनेत्री; सांगितलं लग्न न करण्यामागचं खरं कारण

Pavitra Rishta : पवित्र रिश्ता मालिका आजही अनेकांच्या मनात घर करून आहे. मालिकेची कथा, पटकथा , अभिनय त्यासोबतच गाणे सर्व काही चाहत्यांच्या मनावर आजही राज करत आहे. मात्र तुम्हांला माहिती आहे का की या मालिकेतील एक अभिनेत्री आजही अविवाहित आहे. 'पवित्र रिश्ता' आणि 'कुमकुम भाग्य' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री स्वाती आनंद (Swati Anand) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

25 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये

63 वर्षांची झालेली स्वाती आजही अविवाहित आहे आणि विशेष म्हणजे हा तिचा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे. गेल्या तब्बल 25 वर्षांपासून ती एका व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये असली तरी या नात्याबद्दल तिने कधीही सार्वजनिकरित्या बोलणं किंवा सोशल मीडियावर काही शेअर करणं पसंत केलं नाही. अलीकडेच 'टेली मसाला'ला दिलेल्या मुलाखतीत स्वातीने लग्न न करण्यामागचं कारण स्पष्ट केलं. ती म्हणाली, "मला कधीच असं वाटलं नाही की मी लग्न करावं. अगदी लहानपणापासूनच मी आईला सांगायचे की, मी आयुष्यभर एकटीच राहणार. माझी आई मात्र माझं लग्न मोठ्या थाटामाटात करण्याचं स्वप्न पाहायची." ('Pavitra Rishta' fame Swati Anand)

'तो' प्रश्न कायम माझ्या मनात

ती पुढे म्हणाली, "मी मोठी होत गेले तसं माझे विचार घरच्यांनाही समजू लागले. माझ्या कुटुंबाने मला नेहमीच भरपूर स्वातंत्र्य दिलं. त्यामुळे लग्नानंतरही मला असंच स्वातंत्र्य मिळेल का, हा प्रश्न कायम माझ्या मनात होता." स्वातीने नातेसंबंधांबद्दलचे तिचे विचारही मांडले. "मी खूप भावूक स्वभावाची आहे. एखाद्या नात्यात मी शंभर टक्के देत असेन, तर समोरच्याकडून किमान अर्धी तरी साथ मिळावी, अशी अपेक्षा असणं चुकीचं नाही. माणूस असल्यामुळे अपेक्षा असतातच. काळानुसार अनेक नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि आजूबाजूच्या बदलत्या परिस्थितीचाही त्यावर परिणाम होतो," असं ती म्हणाली. ('Pavitra Rishta' fame Swati Anand)

लग्न न करण्यामागचं खरं कारण

लहानपणापासून घरात मिळालेलं प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा लग्नानंतर मिळाला नाही तर काय, ही भीतीही तिला सतावत होती. याच कारणामुळे तिने लग्न न करण्याचा निर्णय कायम ठेवला, असंही तिने स्पष्ट केलं. लग्नावरून नातेवाईकांकडून अनेकदा टोमणे ऐकावे लागले, तरीही तिच्या निर्णयात कधी बदल झाला नाही. "मला कोणाशीच काही अडचण नव्हती. मी सर्वांसोबत सहज मिसळते. माझ्या आई-वडिलांनी कधीही माझ्यावर लग्नासाठी दबाव आणला नाही. उलट त्यांनी माझा निर्णय समजून घेतला आणि त्याचा त्यांना कधीही पश्चात्ताप झाला नाही. ते माझ्या आनंदातच आनंदी आहेत," असं स्वाती आनंदने मुलाखतीत सांगितलं.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >