Thursday, July 9, 2026

Weather Update : बंगालच्या उपसागरातील ढग निवळले,राज्यातील पावसाचा जोर ओसरणार; पुणे, सातारा घाटमाथ्याला 'ऑरेंज अलर्ट'

Weather Update : बंगालच्या उपसागरातील ढग निवळले,राज्यातील पावसाचा जोर ओसरणार; पुणे, सातारा घाटमाथ्याला 'ऑरेंज अलर्ट'

मुंबई(Mumbai) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थैमान घालणाऱ्या पावसाचा जोर आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र, अद्यापही काही जिल्ह्यांत पावसाचा धोका कायम असून, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यासाठी भारतीय हवामान विभागाने गुरुवारी (९ जुलै) 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे.

पुणे आणि सातारा(Pune - Satara) घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने स्थानिक प्रशासनाला आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित कोकण किनारपट्टी, घाटमाथ्यातील काही भाग आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील ढगांची संख्या कमी झाल्यामुळे, पुढील काही दिवसांत उर्वरित राज्यात पावसाची उघडीप मिळण्याची शक्यता आहे. आता पाऊस प्रामुख्याने स्थानिक हवामानानुसार पडेल. गेल्या २४ तासांत कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर प्रचंड होता. अनेक ठिकाणी ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. राज्यातील सर्वाधिक पाऊस घाटमाथ्यावरील ताम्हिणी (५३० मिमी) येथे झाला. सोलापूरमध्ये राज्यातील उच्चांकी ३२ अंश सेल्सिअस तापमान, तर महाबळेश्वरमध्ये नीचांकी १८.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.

सध्या मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात एक ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून ते ईशान्येकडे सरकत आहे. याशिवाय, नैर्ऋत्य राजस्थान ते बांगलादेश असा एक कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. दक्षिण गुजरात आणि केरळ किनारपट्टीवरही कमी दाबाचे पट्टे सक्रिय असल्याने राज्यातील काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण अजूनही कायम आहे.

हवामान विभागाने घाटमाथ्यावरील रहिवाशांना आणि डोंगराळ भागात प्रवास करणाऱ्या पर्यटकांना अत्यंत सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या भागात जाणे टाळावे, असे सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >