Thursday, July 9, 2026

Ajit Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 'पद्मविभूषण' द्या!

Ajit Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 'पद्मविभूषण' द्या!

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; 'पद्म' पुरस्कारासाठी शिफारस प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मरणोत्तर 'पद्मविभूषण' पुरस्काराची शिफारस करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. पक्षाचे विधानसभेचे मुख्य प्रतोद चेतन तुपे (Chetan Tupe) यांनी राष्ट्रवादीच्या (NCP) सर्व विधानसभा आणि विधानपरिषद आमदारांच्या स्वाक्षरीसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी या संदर्भातील पत्र पाठवले असून, या पुरस्कारासाठी शिफारस प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या वतीने केंद्र सरकारकडे तातडीने पाठवण्यात यावा, अशी विनंती केली आहे.

या पत्रात तुपे यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत म्हटले आहे की, २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या एका दुर्दैवी अपघातात महाराष्ट्राने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना गमावले. ही महाराष्ट्र आणि देशाची कधीही न भरून निघणारी हानी आहे. एक कणखर प्रशासक, अहोरात्र कष्ट करणारे लोकप्रतिनिधी आणि 'अॅक्शन ओरिएंटेड' नेते म्हणून त्यांनी नेहमीच जनमानसावर अधिराज्य गाजवले असून त्यांच्या या महान राष्ट्रसेवेचा आणि नेतृत्वाचा यथोचित गौरव म्हणून त्यांना केंद्र सरकारचा अत्यंत मानाचा 'पद्मविभूषण' (मरणोत्तर) पुरस्कार जाहीर व्हावा, ही महाराष्ट्रातील तमाम जनतेची आणि लोकप्रतिनिधींची तीव्र भावना आहे.

राज्याचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी विक्रमी वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडून प्रत्येक क्षेत्राला न्याय दिला असून पायाभूत सुविधा, रस्ते विकास, मेट्रो आणि सिंचन क्षेत्रात त्यांनी घेतलेले निर्णय क्रांतिकारी ठरले आहेत. याशिवाय, महाराष्ट्रातील सहकार चळवळ मजबूत करण्यात आणि शेतकऱ्यांना संकटकाळात थेट आर्थिक मदत मिळवून देण्यात त्यांनी नेहमीच आग्रही भूमिका घेतली, तसेच समाजघटकातील तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रशासनाला गतिमान केले. अजितदादांचे अचानक जाणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एका युगाचा अंत झाल्यासारखे असून अशा या महान लोकनेत्याच्या अथांग परिश्रमांचा, दूरदृष्टीचा आणि जनसेवेचा मरणोत्तर सर्वोच्च सन्मान होणे हे संपूर्ण राज्यासाठी आणि देशासाठी अभिमानास्पद ठरेल, असे मुख्य प्रतोद चेतन तुपे यांनी पत्रात नमूद केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >