Tuesday, July 7, 2026

India Indonesia Relations : भारत-इंडोनेशिया मैत्री कॉपीराइटच्या पलीकडे- पंतप्रधान मोदीं

India Indonesia Relations : भारत-इंडोनेशिया मैत्री कॉपीराइटच्या पलीकडे- पंतप्रधान मोदीं

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी इंडोनेशियामधील भारतीय समुदाय आणि स्थानिक नागरिकांना संबोधित करताना सांगितले की, 140 कोटी भारतीयांचे प्रतिनिधित्व करणे हे त्यांच्यासाठी मोठे भाग्य आहे. लोकशाहीची जननी असलेल्या भारताच्या वतीने त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान मोदी म्हणाले,“इंडोनेशियातील नागरिक, मुले, युवक आणि महिलांनी हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवसांपैकी एक बनवला आहे. ज्या आत्मीयतेने आणि प्रेमाने माझे स्वागत करण्यात आले, ते मी कधीही विसरू शकणार नाही.” यावेळी त्यांनी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांच्या त्या वक्तव्यालाही उत्तर दिले, ज्यामध्ये त्यांनी मोदींच्या योजनांचा अवलंब करण्याबाबत आणि त्यावर कोणाचाही कॉपीराइट नसल्याचे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “सन्मानावर कोणाचाही कॉपीराइट असू शकत नाही. राष्ट्राध्यक्ष प्रबोवो यांच्याशी असलेली माझी मैत्री ही कॉपीराइटच्या मर्यादांपलीकडची आहे.” त्यांच्या या विधानाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. पंतप्रधान मोदी यांनी पुढे सांगितले की, भारत हा विस्तारवादावर नव्हे तर विकासवादावर विश्वास ठेवणारा देश आहे. “सबका साथ, सबका विकास” हा भारताचा मूलमंत्र असून, त्याच विचारसरणीच्या आधारावर भारत जगातील इतर देशांसोबत सहकार्याची वाटचाल करत आहे. भारताची धोरणे आणि जागतिक सहकार्याची दिशा याच मंत्राने निश्चित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील संबंध शतकानुशतके जुने असल्याचे सांगताना मोदी म्हणाले की, दोन्ही देशांचा सामायिक सांस्कृतिक वारसा रामायण(Ramayan) आणि महाभारताशी जोडलेला आहे. तसेच नालंदाच्या ज्ञानपरंपरेनेही दोन्ही राष्ट्रांना एकमेकांशी जोडले आहे. त्यांनी बोरोबुदूर आणि प्रम्बाननसारख्या ऐतिहासिक स्मारकांचा उल्लेख करत सांगितले की, हीच सांस्कृतिक परंपरा भारत-इंडोनेशिया मैत्री अधिक दृढ करते. “भारत आणि इंडोनेशिया केवळ समुद्र सामायिक करत नाहीत, तर आपला इतिहासही समान आहे. आपले नाते वायांग नृत्य, संगीत आणि सांस्कृतिक परंपरांशी जोडलेले आहे. आपण बोरोबुदूर आणि प्रम्बाननसारख्या अद्भुत स्मारकांशी, इंडोनेशियाच्या राष्ट्रीय प्रतीक गरुडाशी तसेच बालीच्या उत्सवांच्या आनंदाशी जोडलेले आहोत. खाद्यसंस्कृतीबाबत बोलायचे झाले तर क्रुपुक आणि पापड यांपैकी कोण अधिक कुरकुरीत आहे हे सांगणे कठीण आहे; मात्र मसाला आणि बुंबू या दोन्ही आपल्या जीवनात चव आणि रंग भरतात,” असे मोदी म्हणाले.

इंडोनेशियाच्या संसदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी ऐतिहासिक संदर्भ देत सांगितले की, 1950 मध्ये भारताने पहिला प्रजासत्ताक दिन साजरा केला तेव्हा इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सुकर्णो हे त्या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. तसेच, बांडुंग परिषद च्या काळात राष्ट्राध्यक्ष सुकर्णो आणि भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी जगाला स्पष्ट संदेश दिला होता की, स्वतंत्र राष्ट्रांना स्वतःचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. पुढे बोलताना मोदी म्हणाले की, भारत आणि इंडोनेशिया हे जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेल्या समाजांपैकी आहेत. दोन्ही देश महत्त्वाच्या सागरी शक्ती असून ‘ग्लोबल साउथ’चा प्रभावी आवाज म्हणून उदयास आले आहेत. ही दोन्ही राष्ट्रे प्राचीन संस्कृतींची वारसदार असून भविष्यासाठी नैसर्गिक भागीदार आहेत. भारत-इंडोनेशिया यांच्यातील सामरिक, आर्थिक आणि सांस्कृतिक सहकार्य अधिक बळकट करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असेही सांगितले की, दहशतवादासारख्या गंभीर मुद्द्यांवर भारत आणि इंडोनेशिया नेहमीच एकमेकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत.ते म्हणाले, “गेल्या वर्षी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इंडोनेशियाने भारताला ठाम पाठिंबा दिला होता. त्याबद्दल मी इंडोनेशिया सरकार आणि तेथील जनतेचे मनःपूर्वक आभार मानतो.” पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, दहशतवादाविरोधातील लढ्यात दोन्ही देश संयुक्त कार्यगटाच्या माध्यमातून एकत्रितपणे काम करत आहेत. भविष्यातही या सहकार्याला अधिक बळकटी देत दहशतवादाविरोधातील लढा अधिक प्रभावी करण्यासाठी दोन्ही देश कटिबद्ध राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >