Monday, July 6, 2026

Ashadhi Wari 2026 : मुसळधार पावसामुळे इंद्रायणीला महापूर; आळंदीकडे जाणारे चारही पूल पाण्याखाली

Ashadhi Wari 2026 : मुसळधार पावसामुळे इंद्रायणीला महापूर; आळंदीकडे जाणारे चारही पूल पाण्याखाली

वारकऱ्यांना 'आहात तिथेच थांबण्याचे' उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आवाहन!

पुणे : यंदाच्या आषाढी वारीच्या (२०२६) पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचे आणि तातडीचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे आळंदीत पूरस्थिती निर्माण झाली असून, इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून, वारकरी व भाविकांनी सध्या आळंदीकडे येऊ नये, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

इंद्रायणी नदीला पूर, चारही पूल पाण्याखाली

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, नदीचे पाणी पुलांवरून वाहत आहे. आळंदी शहराला जोडणारे चारही मुख्य पूल सध्या पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे शहरात प्रवेश करणे सध्या अत्यंत धोकादायक बनले आहे.

वारकऱ्यांनो, आहात तिथेच थांबा!

पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या आणि वारकरी मोठ्या श्रद्धेने आळंदीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. मात्र, प्रवासात असलेल्या या सर्व वारकरी आणि भाविकांना प्रशासनाने हात जोडून विनंती केली आहे की, "सध्या आळंदी शहरात येणे सुरक्षित नाही. त्यामुळे ज्या भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे, त्यांनी आपला प्रवास तात्काळ थांबवावा. तुम्ही ज्या ठिकाणी आहात, तिथेच सुरक्षित आसरा घ्यावा आणि प्रशासनाची पुढील अधिकृत सूचना मिळेपर्यंत आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये."

अफवांवर विश्वास ठेवू नका; प्रशासनाला सहकार्य करा

या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग युद्धपातळीवर काम करत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी आणि भाविकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, पुराचे पाणी पाहण्यासाठी किंवा गर्दी करण्यासाठी नदीपात्र, घाट परिसर आणि बंद करण्यात आलेल्या पुलांच्या परिसरात जाणे टाळावे, असे सक्त निर्देश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. सर्व वारकरी आणि नागरिकांनी संयम बाळगून प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतरच पुढील सूचना देण्यात येतील.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >