Monday, July 6, 2026

Minister Shivendrasinhraje Bhosale : मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची घटनास्थळी धाव; बोगद्याला कोणतीही हानी नाही

Minister Shivendrasinhraje Bhosale : मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची घटनास्थळी धाव; बोगद्याला कोणतीही हानी नाही

- सुरक्षिततेनंतरच वाहतूक सुरू होणार

मुंबई : मुंबई–पुणे कनेक्टिंग लिंक (Mumbai - Pune Missing Link) प्रकल्पाच्या एंट्री पॉईंटजवळ दरड कोसळल्याच्या (landslide) घटनेनंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Minister Shivendrasinhraje Bhosale) यांनी सोमवारी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), पोलीस प्रशासन आणि संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Minister Shivendrasinhraje Bhosale) यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरावरील पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अचानक बदल झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दगड आणि माती घसरून खाली आली. मात्र, या घटनेमुळे कनेक्टिंग लिंकच्या मुख्य बोगद्याला कोणतीही संरचनात्मक हानी झालेली नसल्याचे प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाले आहे.

दरड कोसळल्यामुळे बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळील संरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या स्लॅबचा काही भाग तसेच संरक्षक भिंतीचा भाग कोसळून रस्त्यावर पडला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीवर तात्पुरता परिणाम झाला असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.

सध्या परिसरात मुसळधार पाऊस आणि दाट धुके असल्याने डोंगराच्या माथ्यावरील परिस्थितीचे अचूक निरीक्षण करणे शक्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले. पाऊस कमी झाल्यानंतर भू-तज्ज्ञ आणि अभियंत्यांकडून सविस्तर तांत्रिक पाहणी केली जाईल. पाण्याचा प्रवाह नेमका कशामुळे बदलला, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी कोणत्या कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या लागतील, याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, रस्त्यावर पडलेला स्लॅब, दगड आणि इतर मलबा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. संबंधित यंत्रणांना हे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून परिसर पूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.

या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय पोलीस प्रशासन आणि एमएसआरडीसी यांच्या संयुक्त सुरक्षा पाहणी व जोखीम मूल्यांकनानंतरच घेतला जाणार आहे. नागरिकांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची पूर्ण खात्री झाल्यानंतरच रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असेही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Minister Shivendrasinhraje Bhosale) यांनी स्पष्ट केले.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >