Monday, July 6, 2026

Nashik : अंजनेरी, ब्रह्मगिरीसह सर्व पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद, वनविभागाचा मोठा निर्णय; नाशिकमध्ये रेड अलर्ट

Nashik : अंजनेरी, ब्रह्मगिरीसह सर्व पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद, वनविभागाचा मोठा निर्णय;  नाशिकमध्ये रेड अलर्ट

Nashik : नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोर धरला असून घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. संभाव्य अतिवृष्टी आणि ढगफुटीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने (Forest Department) मोठा निर्णय घेतला आहे. नाशिक, त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) आणि इगतपुरी वनहद्दीतील सर्व प्रमुख पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत. वनविभाग, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने नागरिकांना पर्यटनाचा मोह टाळण्याचे आवाहन केले आहे. (Nashik Tourist Spots Closed)

धबधबे तसेच डोंगररांगांमध्ये पर्यटकांना प्रवेशबंदी

सोमवारी, ६ जुलै रोजी घाटप्रदेशासाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आल्यानंतर पहाटेपासूनच पावसाचा जोर वाढला. त्यामुळे दुपारपासून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अंजनेर (Anjaneri) , ब्रह्मगिरी (Brahmagiri) , हरिहरगड (Harihargad) , पहिने, दुगारवाडी, त्रिंगलवाडी आणि इगतपुरी (Igatpuri) परिसरातील धबधबे तसेच डोंगररांगांमध्ये पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी लागू करण्यास सुरुवात केली. वनविभागाच्या हद्दीतील सर्व पर्यटनस्थळांवर कोणत्याही पर्यटकाला प्रवेश दिला जाणार नसून, पुढील आदेश येईपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते. मात्र, यंदा हवामानाचा वाढता धोका लक्षात घेऊन प्रशासनाने सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. (Nashik Tourist Spots Closed)

प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर

हवामान विभागाने मंगळवारी, ७ जुलै रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या मध्यभागी अतिमुसळधार पाऊस आणि काही भागांत ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या इशाऱ्यानंतर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून आपत्कालीन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे. पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर (Siddhesh Savardekar) यांनी त्र्यंबकेश्वर आणि नाशिक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश देत सर्व पर्यटनस्थळे बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. पर्यटकांना कोणत्याही परिस्थितीत धोकादायक भागात प्रवेश दिला जाणार नाही, याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. (Nashik Tourist Spots Closed)

प्रवेशबंदीची कडक अंमलबजावणी केली जाणार

या निर्णयाची माहिती त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रातील काचुर्ली, हर्षेवाडी, पहिने आणि कळमुस्ते येथील संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांच्या अध्यक्ष आणि सचिवांनाही देण्यात आली आहे. तसेच वनहद्दीकडे जाणाऱ्या रस्त्यांवरच पर्यटकांना अडवण्यासाठी स्थानिक पोलिसांशी समन्वय साधण्यात आला असून, प्रवेशबंदीची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. वनविभागाने नागरिकांना आणि पर्यटकांना आवाहन केले आहे की, हवामान सामान्य होईपर्यंत धबधबे, डोंगर आणि घाट परिसरात जाणे टाळावे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची आणि कुटुंबीयांची सुरक्षितता जपावी.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >