Saturday, July 4, 2026

Navnath Ban : 'रामरक्षा नव्हे, आधी पक्षरक्षा करा'; उद्धव ठाकरेंवर भाजपाचा जोरदार हल्लाबोल

Navnath Ban : 'रामरक्षा नव्हे, आधी पक्षरक्षा करा'; उद्धव ठाकरेंवर भाजपाचा जोरदार हल्लाबोल

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपाने पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. "जनाधार गमावल्यानंतर रामरक्षा म्हणण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी आधी पक्षरक्षा करावी," असा घणाघात भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath Ban) यांनी केला. तसेच हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप त्यांनी ठाकरे यांच्यावर केला.

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन (Navnath Ban) म्हणाले की, अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशभरातील साधुसंत आणि मान्यवर उपस्थित होते. मात्र उद्धव ठाकरे त्या सोहळ्याला गेले नाहीत. काँग्रेससोबतच्या राजकीय भूमिकेमुळे त्यांनी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून दूर राहणे पसंत केले, असा आरोप त्यांनी केला.

यावेळी त्यांनी राम मंदिर आंदोलनाचाही उल्लेख केला. "राम मंदिरासाठी आंदोलन सुरू असताना भाजपाचे कार्यकर्ते 'मंदिर वही बनाएंगे'च्या घोषणा देत होते. त्यावेळी उद्धव ठाकरे 'मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे' म्हणत या आंदोलनाची खिल्ली उडवत होते. आज मात्र त्यांना रामभक्तीची आठवण झाली आहे," अशी टीका बन यांनी केली. (Navnath Ban)

नवनाथ बन यांनी पुढे म्हटले की, "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रामाणिक राहता आले नाही, तर प्रभू श्रीरामांच्या विचारांबाबत बोलण्याचा नैतिक अधिकारही उद्धव ठाकरे यांना नाही. शिवाजी पार्कवरील सभेत 'माझ्या तमाम हिंदू बांधवांनो' असे संबोधनही त्यांनी टाळले होते, हे जनता विसरलेली नाही," असेही ते म्हणाले. (Navnath Ban)

राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणावर बोलताना बन यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणातील दोषींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल आणि प्रभू श्रीरामांच्या श्रद्धेशी खेळ करणाऱ्यांना कायद्यापुढे उभे केले जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. मुंबई महापालिकेवर २५ वर्षे सत्ता असतानाही शिवसेनेने मुंबईकरांना अपेक्षित सुविधा दिल्या नाहीत, असा आरोप करत त्यांनी भाजपाच्या काळात कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प आणि बीडीडी चाळ पुनर्विकासासारखी महत्त्वाची कामे झाल्याचा दावा केला. (Navnath Ban)

मुंबईतील अलीकडील दुर्घटनांनंतर राज्य सरकारने संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आणि कंत्राटदारांवर गुन्हे दाखल केले, याचा उल्लेख करत बन म्हणाले, "उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात एखाद्या कंत्राटदारावर अशी कारवाई झाली होती का? याचे उत्तर संजय राऊत यांनी द्यावे," असा सवालही त्यांनी उपस्थित केला. (Navnath Ban)

राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना भाजपाकडून करण्यात आलेल्या या टीकेमुळे ठाकरे विरुद्ध भाजपातील शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >