Wednesday, July 1, 2026

Nashik : सदोष रस्त्यामुळे अपघात; मनपा देणार भरपाई; अपघातांना जबाबदार ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Nashik : सदोष रस्त्यामुळे अपघात; मनपा देणार भरपाई; अपघातांना जबाबदार ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Nashik Simhastha Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सुरू असलेली विकासकामे नाशिककरांच्या जीवावर बेतत असल्याचा गंभीर आरोप महापालिकेच्या महासभेत करण्यात आला. रस्ते खोदकामातील निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातांत अनेक नागरिकांना जीव गमवावा लागल्याचा संताप व्यक्त करत लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला धारेवर धरले. यानंतर महापौर हिमगौरी आडके-आहेर (Himgauri Adke-Aaher) यांनी अपघातांसाठी जबाबदार ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे, तसेच पीडित कुटुंबांना आर्थिक भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

कुंभमेळ्याच्या विकासकामांवरून महासभेत गदारोळ

मंगळवारी झालेल्या नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) महासभेत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांवरून अभूतपूर्व गदारोळ झाला. शहरभर सुरू असलेल्या रस्ते खोदकामांमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत लोकप्रतिनिधींनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींनी सभागृहात सांगितले की, रस्ते खोदकामातील निष्काळजीपणा, सुरक्षेचा अभाव आणि निकृष्ट नियोजन यामुळे झालेल्या अपघातांमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनांची केवळ नोंद घेऊन चालणार नाही, तर दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली.

अपघाताची चौकशी अन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

या पार्श्वभूमीवर महापौर हिमगौरी आडके-आहेर यांनी प्रत्येक अपघाताची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश दिले. ज्या प्रकरणांमध्ये ठेकेदारांचा निष्काळजीपणा सिद्ध होईल, त्या ठिकाणी संबंधितांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. याशिवाय अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना महापालिकेकडून आर्थिक मदत देण्याचाही निर्णय घेण्यात आला.

ड्रेनेज, पाणीपुरवठा आणि वीजवाहिन्यांचे नुकसान

महासभेत केवळ अपघातांचाच मुद्दा नव्हे, तर खोदकामांमुळे निर्माण झालेल्या इतर गंभीर समस्याही समोर आल्या. ड्रेनेज, पाणीपुरवठा आणि वीजवाहिन्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने अनेक भागांमध्ये नागरिकांना दूषित पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत असल्याचे नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले. इंदिरानगर (Indiranagar) परिसरात ड्रेनेज आणि पाणीपुरवठा लाइन एकत्र झाल्याने दूषित पाणी नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला.

या दूषित पाण्यामुळे एका गर्भवती महिलेने आपले बाळ गमावल्याचा धक्कादायक दावा महासभेत करण्यात आला. उपमहापौर विलास शिंदे (Vilas Shinde) यांनी सिंहस्थाची कामे करणाऱ्या काही ठेकेदारांकडे गुंडप्रवृत्तीची माणसे असून, ती नागरिक, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनाही धमकावत असल्याचा गंभीर आरोप केला. या आरोपामुळे सभागृहात मोठी खळबळ उडाली.

...तर रस्ते खोदणाऱ्या कंपन्या आणि ठेकेदारांवर गुन्हे

दरम्यान, रस्ते रुंदीकरणाच्या कामांबाबत आयुक्त मनीषा खत्री (Manisha Khatri) यांनी बारदान फाटा ते त्र्यंबक रोड या मार्गासाठी ४६ कोटी रुपयांचे नियोजन असल्याची माहिती दिली. मात्र, कामांच्या गुणवत्तेबाबत आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत उपस्थित सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महापौरांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेत महापालिकेची परवानगी न घेता किंवा लोकप्रतिनिधींची नावे वापरून रस्ते खोदणाऱ्या कंपन्या आणि संबंधित ठेकेदारांवरही तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. महासभेत वृक्षप्राधिकरण समितीच्या सदस्यांची नियुक्तीही करण्यात आली. मात्र, सभेचे केंद्रबिंदू ठरले ते सिंहस्थ विकासकामांतील कथित निष्काळजीपणा, भ्रष्टाचार आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न.

अपघातग्रस्त कुटुंबांना न्याय मिळणार ?

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सुरू असलेली विकासकामे शहराच्या भविष्यासाठी महत्त्वाची असली, तरी त्याच कामांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात येत असतील, तर तो अत्यंत गंभीर विषय आहे. आता दोषी ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते का आणि अपघातग्रस्त कुटुंबांना न्याय मिळतो का, याकडे संपूर्ण नाशिकचे लक्ष लागले आहे. कुंभमेळ्याच्या कामांचा वेग आणि नागरिकांची सुरक्षितता यांचा समतोल राखणे ही प्रशासनासमोरील सर्वात मोठी जबाबदारी आहे. निष्काळजीपणामुळे एकाही नागरिकाचा जीव जाऊ नये, अशीच अपेक्षा आता नाशिककर व्यक्त करत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >