Thursday, June 25, 2026

Women's T20 World Cup : शेफाली वर्माची दमदार अर्धशतकी खेळी; भारताने बांगलादेशला ५ गडी राखून हरवलं

Women's T20 World Cup : शेफाली वर्माची दमदार अर्धशतकी खेळी; भारताने बांगलादेशला ५ गडी राखून हरवलं

इंग्लंड : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिला टी-२० विश्वचषक (Women's T20 World Cup) स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने बांगलादेशचा ५ गडी राखून पराभव करत उपांत्य फेरी (Semi Final) गाठण्याच्या आशा जिवंत केल्या आहेत. मँचेस्टर येथे झालेल्या या सामन्यात भारताने १३७ धावांचे लक्ष्य १६.५ षटकांत ५ गडी गमावत सहज पार केले.

शेफाली वर्मा (५३ धावा, ३४ चेंडू, ८ चौकार, १ षटकार) आणि यास्तिका भाटिया (२३ धावा, १८ चेंडू, ३ चौकार) यांनी पॉवरप्लेमध्ये (Powerplay) ६३ धावांची भागीदारी करत भारताच्या विजयाचा मजबूत पाया रचला.

यानंतर यास्तिका भाटिया आणि ऋचा घोष (१०) झटपट बाद झाल्याने काहीसा दबाव निर्माण झाला. मात्र जेमिमा रॉड्रिग्ज (२६ धावा, १५ चेंडू, ३ चौकार, १ षटकार) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (१३* धावा) यांनी संयमी फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. दमदार अर्धशतकासाठी शेफाली वर्माची सामनावीर (Player of the Match) म्हणून निवड करण्यात आली.

यापूर्वी नाणेफेक (Toss) जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशची सुरुवात खराब झाली. दिलारा अख्तर (४) लवकर बाद झाली. त्यानंतर जुइया फिरदौस (३३) आणि कर्णधार निगार सुलताना (३२) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. एका टप्प्यावर बांगलादेश मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत असताना भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या षटकांत शानदार पुनरागमन केले.

राधा यादवने २८ धावांत ३ बळी, तर श्री चरणीने २१ धावांत २ बळी घेत बांगलादेशला २० षटकांत ८ बाद १३६ धावांवर रोखले. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी उत्कृष्ट धावांचा पाठलाग (Run Chase) करत महत्त्वाचा विजय नोंदवला आणि स्पर्धेतील आव्हान कायम राखले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >