Tuesday, June 16, 2026

२३ व्या वर्षी १९ सरकारी परीक्षा उत्तीर्ण!

२३ व्या वर्षी  १९ सरकारी परीक्षा उत्तीर्ण!

सरकारी परीक्षांची विश्वासार्हता आणि निवड प्रक्रियेतील दिरंगाईमुळे आजच्या तरुण पिढीमध्ये स्पर्धा परीक्षांबद्दल उदासीनता वाढत असतानाच, छत्तीसगडमधील एका तरुणीने नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून ५० किमी अंतरावर असलेल्या तिल्डा नेवरा येथील रहिवासी चारू पांडे हिने वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी केंद्र आणि राज्य सरकारच्या तब्बल १९ प्रतिष्ठित स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करण्याचा विक्रम केला आहे. तिच्या या अद्भुत यशाची दखल घेत भारताच्या राष्ट्रपतींनी तिला स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या 'ॲट होम' सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे.

चारूने एसएससी सीजीएल, एसएससी सीएचएसएल, एसएससी एमटीएस, एसएससी जीडी, एसएससी सीपीओ, आयबीपीएस पीओ, एसबीआय, दिल्ली पोलीस आणि छत्तीसगड उपनिरीक्षक यांसह एकूण १९ परीक्षांमध्ये यश मिळवले आहे. सध्या ती नवी दिल्ली येथील भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) मुख्य कार्यालयात सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी (AAO) म्हणून कार्यरत आहे.चारूचे वडील प्रवीण कुमार पांडे हे सरकारी शिक्षक आहेत, तर आई सुधा पांडे गृहिणी आहेत. चारूने तिचे प्राथमिक शिक्षण तिल्डा येथील खासगी शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर दुर्ग येथील प्रेमचंद कॉलेजमधून तिने गणित विषयात पदवी संपादन केली. आपल्या यशाबद्दल बोलताना चारूने सांगितले की, विषयनिहाय रणनीती, नियमित सराव परीक्षा (Mock Tests) आणि सततचे आत्मपरीक्षण यांमुळे तिला हे यश मिळाले.

एकाच वेळी एवढ्या परीक्षा देण्यामागचे कारण सांगताना ती म्हणाली, "अनेक परीक्षांच्या पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्याचा निकाल लागण्यास बराच वेळ लागतो. त्यामुळे एका निकालाच्या आशेवर बसून न राहता, मी फॉर्म सुटतील तशा परीक्षा देत गेले. माझ्या शिक्षकांनीही मला जास्तीत जास्त परीक्षा देण्यास प्रोत्साहित केले. स्पर्धा परीक्षांमध्ये स्पष्ट ध्येय आणि योग्य नियोजन असेल, तर यश नक्की मिळते."तिने हे देखील स्पष्ट केले की, जरी ती अनेक परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाली असली, तरी तिने रुजू न झालेल्या जागा प्रतीक्षा यादीतील इतर गुणवंत उमेदवारांना मिळाल्या, ज्यामुळे कोणाचेही नुकसान झाले नाही.

 

'ॲट होम' कार्यक्रम म्हणजे काय?

हा राष्ट्रपतींद्वारे आयोजित केला जाणारा एक उच्चस्तरीय औपचारिक स्नेहमेळावा आहे. दरवर्षी स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) आणि प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) च्या संध्याकाळी राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक 'अमृत उद्यान' प्रांगणात हा सोहळा पार पडतो.या कार्यक्रमात राष्ट्रपती स्वतः यजमान असतात. या सोहळ्याला पंतप्रधान, उपराष्ट्रपती, सरन्यायाधीश, केंद्रीय मंत्री, लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख, परदेशी मुत्सद्दी आणि देशासाठी उल्लेखनीय कार्य करणारे सामान्य नागरिक यांना निमंत्रित केले जाते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा