Tuesday, June 23, 2026

Nitesh Rane : आयुष्यातील प्रत्येक क्षण हिंदूंसाठी!

Nitesh Rane : आयुष्यातील प्रत्येक क्षण हिंदूंसाठी!

 मंत्री नितेश राणे; वाढदिवसाला सुट्टी न घेता अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी

मुंबई : माझ्या मतदारसंघातील आणि राज्यातील जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्यामुळेच मी आज मंत्री म्हणून काम करू शकत आहे. माझा वाढदिवस असला तरी मी प्रथम जनतेचा सेवक आहे आणि माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा हिंदू समाजासाठी असला पाहिजे, याच हेतूने मी वाढदिवसाला कोणतीही सुट्टी न घेता अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी झालो आहे," असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी केले. विधानभवनाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी त्यांनी तिहेरी तलाक, लव्ह जिहादसह विविध विषयांवर भाष्य केले. विधानसभेत झालेल्या तिहेरी तलाकच्या चर्चेवरून त्यांनी विरोधकांना फैलावर घेतले. राणे म्हणाले, "आम्ही ज्या 'गज्वा-ए-हिंद' आणि भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या षड्यंत्राचा वारंवार उल्लेख करतो, त्याचे चित्र आज विधानसभेत पाहायला मिळाले. एका बाजूला मुस्लिम महिलांना फोनवरून तलाक दिला जात असताना, त्यांना न्याय देण्याऐवजी सभागृहात इस्लामचे दाखले दिले जात होते. हे पाहून आपण महाराष्ट्राच्या की पाकिस्तानच्या विधानसभेत बसलो आहोत, असा भास निर्माण झाला होता. ज्यांनी या लक्षवेधीला विरोध केला, त्यांनी साध्या प्रश्नाचे उत्तर द्यावे, की त्यांना देशाचे संविधान महत्त्वाचे वाटते की इस्लाम आणि कुराण? स्वतःची घरे वाचवताना यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आठवते आणि धर्माचा विषय आला की कुराण आठवते. जर कोणाला पाकिस्तानची जिहादी भाषा बोलायची असेल, तर त्यांनी खुशाल तिकडे चालते व्हावे. इस्लामचे लांगुलचालन महाराष्ट्राच्या विधानसभेत करण्याऐवजी मदरसा किंवा मशिदीत करावे. सपा आमदार अबू आझमी यांना आता खरोखरच पाकिस्तानात पाठवण्याची वेळ आली आहे, अन्यथा ही मंडळी इथे घाण करायची थांबवणार नाहीत," असा हल्लाबोल त्यांनी केला. आमच्यासाठी आमच्या धर्माची अस्मिता सर्वोच्च आहे. धर्माच्या आड कोणी आले तर भाजप-शिवसेना किंवा इतर पक्ष नंतर, आधी आम्ही हिंदू म्हणून चोख उत्तर देऊ. हिंदू धर्माची बदनामी करणाऱ्यांनी तात्काळ राजीनामे देऊन पाकिस्तानात निघून जावे, असेही राणे म्हणाले.

'उबाठा' आता पक्ष नव्हे, तर बचत गट - दरम्यान, उबाठा गटाकडून दिल्या जाणाऱ्या 'ऑपरेशन तुडवा'च्या इशाऱ्यांवरही नितेश राणे (nitesh rane) यांनी आपल्या खास शैलीत टोलेबाजी केली. "भुंकणारे कुत्रे कधी चावत नाहीत, त्यातलेच संजय राऊत (sanjay raut) आणि उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आहेत. राऊतांनी त्यांचे 'ऑपरेशन तुडवा' लवकर सुरू करावे, आम्ही त्यांची वाट पाहत आहोत. जर बाळासाहेबांचे जुने शिवसैनिक असते, तर आतापर्यंत त्यांनी कृती करून दाखवली असती. 'उबाठा' आता राजकीय पक्ष राहिलेला नाही, तो बचत गट उरला आहे. त्यांच्यापेक्षा जास्त सभासद तर सर्वसामान्य बचत गटांकडे असतात," अशी बोचरी टीका त्यांनी केली. - ठाकरे कुटुंबातील अंतर्गत राजकारणावर भाष्य करताना ते पुढे म्हणाले, "चुकून जर का उबाठा गटाला विरोधी पक्षनेतेपद मिळाले, तर ते भास्कर जाधवांना कधीच मिळणार नाही, ते आदित्य ठाकरेंनाच दिले जाईल. तसेच सध्या उद्धव ठाकरे यांचे जे पक्षप्रमुख पदाचा राजीनामा देण्याचे नाटक सुरू आहे, ते केवळ आदित्य ठाकरे किंवा रश्मी ठाकरे यांना पक्षप्रमुख पदाच्या खुर्चीवर बसवण्यासाठीच चालले आहे," असा दावाही राणे यांनी केला.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >