Friday, August 21, 2026

Girish Mahajan : व्हायरल फोटोप्रकरणी मंत्री गिरीश महाजनांची मुख्यमंत्र्यांसह सायबर विभागाकडे तक्रार

Girish Mahajan : व्हायरल फोटोप्रकरणी मंत्री गिरीश महाजनांची मुख्यमंत्र्यांसह सायबर विभागाकडे तक्रार

उच्च न्यायालयात जाणार; 'एआय' वापरून बनावट फोटो तयार केले

मुंबई : राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून त्यांची सातत्यपूर्ण बदनामी सुरू होती. मात्र, हे फोटो पूर्णपणे बनावट आणि 'एआय' (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून तयार करण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाने तपासानंतर स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर, स्वतः मंत्री गिरीश महाजन यांनी या संपूर्ण प्रकरणामागील सत्य समोर आणले आहे. "ती मुलगी माझ्या दिवंगत मित्राची मुलगी असून तिच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे. अशा घाणेरड्या राजकारणामुळे एका निष्पाप मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते," अशा तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत महाजन यांनी या विकृत राजकारणाविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सायबर विभागाकडे तक्रार केल्याचे सांगितले.

पत्रकार परिषदेत बोलताना गिरीश महाजन यांनी आपल्या कुटुंबाचे मूळ फोटो प्रसारमाध्यमांना दाखवून विरोधकांचे कारस्थान उघडे पाडले. आपली बाजू मांडताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले, "माझ्या संदर्भात जे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर जाणीवपूर्वक शेअर केले जात आहेत, त्यामागील सत्य आज मी जनतेसमोर आणत आहे. ती मुलगी माझ्या अत्यंत जवळच्या मित्राची मुलगी आहे. तिचे वडील आज या जगात हयात नाहीत. आमचे अनेक वर्षांचे कौटुंबिक संबंध आहेत. हे कुटुंब जेव्हा मुंबईत येते, तेव्हा माझ्या मुलीसोबत आणि आमच्या घरी राहते. आमच्या घरचे गणपतीचे आणि कौटुंबिक कार्यक्रमांचे अनेक फोटो आहेत. मात्र, सोशल मीडियावरून आमचे मूळ सेल्फी फोटो चोरून ते क्रॉप करण्यात आले. ज्या मूळ फोटोमध्ये माझी पत्नी आणि माझी स्वतःची मुलगी एकत्र उभे आहेत, तेथून फक्त माझा आणि त्या मुलीचा फोटो 'एआय' तंत्रज्ञानाचा वापर करून वेगळा करण्यात आला आणि तो आक्षेपार्ह पद्धतीने व्हायरल केला गेला. राजकारणात आपण दोन हात करायला नेहमी तयार आहोत, पण अशा पद्धतीमुळे एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्याचा विचका होऊ शकतो याचे भान ठेवले पाहिजे. मी याविरोधात सायबर सेलकडे तक्रार केली असून, त्याचे अधिकृत प्रमाणपत्रही मला मिळाले आहे."

महाजन म्हणाले, "हे फोटो जाणीवपूर्वक आणि एका ठराविक हेतूने शेअर केले जात आहेत. मी या प्रकरणी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर बोललो आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीरता ओळखून चिंता व्यक्त केली असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असा मला पूर्ण विश्वास आहे. यामागे नेमका कोणता राजकीय मेंदू आहे याची मला कल्पना नाही, पण यावर खालच्या पातळीचे राजकारण सुरू आहे. त्या पितृछत्र हरवलेल्या मुलीचे लग्न जमवायचे आहे आणि ती जबाबदारी वडिलांच्या नात्याने माझ्यावर आहे, अशा वेळी हे कृत्य करणे अत्यंत पाप आहे." उच्च न्यायालयात जाणार

महाजन म्हणाले, "मी या विकृतीच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. हे फोटो सोशल मीडियावर सर्वात आधी कोणी टाकले आणि ते कोणी कोणी पुढे फॉरवर्ड केले, त्या डिजिटल गुन्हेगारांची संपूर्ण यादी (लिस्ट) माझ्याकडे तयार आहे. सायबर विभागाच्या अहवालानंतर आता हायकोर्टाच्या माध्यमातून या सर्वांना तुरुंगाची हवा दाखवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही," असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >