Sunday, June 21, 2026

Operation Tiger : 'ऑपरेशन टायगर'मध्ये ट्विस्ट?

Operation Tiger : 'ऑपरेशन टायगर'मध्ये ट्विस्ट?

उबाठा गटा ओमराजेंच्या संपर्कात; शिंदेंचा आमदार तातडीने धाराशिवला रवाना 

मुंबई : उबाठा गटातील ६ खासदारांच्या बंडामुळे देशाच्या राजकारणात खळबळ उडालेली असतानाच, आता या नाट्यमय घडामोडींना एक नवे वळण मिळाले आहे. पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालानंतर त्यांचे पुत्र आणि बंडखोर खासदार ओमराजे यांनी, अद्याप शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला नसल्याचे जाहीर केल्याने उबाठा गटाने तातडीने त्यांच्याशी संपर्क साधला. शनिवारी मध्यरात्री आमदार वरुण सरदेसाई आणि कैलास पाटील यांनी त्यांची भेट घेत, उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा घडवून आणली. हे समजताच एकनाथ शिंदे सतर्क झाले असून, त्यांनी आपला शिलेदार ओमराजे यांच्या भेटीसाठी धाराशिवला रवाना केला आहे.

उबाठा गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी ओमराजे यांची उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा घडवून आणली. या संभाषणात ओमराजेंनी, "तुम्हीच मला मोठे केले आहे; आज मी खासदार आहे, ते केवळ पक्षामुळे. त्यामुळे मी अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. मी माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करूनच पुढील पाऊल उचलेल," अशी माहिती दिली. त्याची माहिती मिळताच एकनाथ शिंदे यांनी तातडीने सूत्रे हलवली.

या 'ऑपरेशन टायगर'मध्ये पडद्यामागून सहभागी असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री तानाजी सावंत हे तात्काळ मुंबईहून धाराशिवच्या दिशेने रवाना झाले. ओमराजेंना पुण्यातून दिल्लीला नेण्याची मुख्य जबाबदारी सावंत यांच्यावरच होती, त्यामुळे आता त्यांची मनधरणी करण्यासाठी स्वतः सावंत मैदानात उतरले आहेत. दरम्यान, ओमराजे निंबाळकर रविवारी सकाळीच पुण्यातून शेकडो कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह धाराशिवकडे निघाले आहेत. तिथे पोहोचल्यावर सोमवारी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधून आपली पुढील अधिकृत भूमिका जाहीर करणार आहेत. दुसरीकडे, तानाजी सावंत हेदेखील धाराशिवच्या भूम-परंडा मतदारसंघात दाखल होत असून, ते धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संजय दीना पाटील यांची कन्या मातोश्रीवर

या बंडात नाव असलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दीना पाटील यांच्या कन्या आणि नगरसेविका राजुल पाटील यांनी रविवारी अचानक 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, माझी आणि माझ्या वडिलांची भविष्यातील राजकीय वाट वेगवेगळी असल्याचे स्पष्टपणे सांगितले. मी मातोश्रीवर येऊन माझी भूमिका स्पष्ट केली आहे. मी पक्षातच आहे, त्यांच्यासोबत आहे. मी माझे कार्य निष्ठेने करेन. आमच्या घरात वैयक्तिक निर्णय घेण्याची पद्धत आहे. माझे वडील त्यांचा निर्णय घेतील, मी माझा निर्णय तुम्हाला कळवत आहे, असे वरिष्ठ नेत्यांना सांगितल्याचे राजुल म्हणाल्या.

मी शिवसेनेतून शिवसेनेतच गेलोय - नागेश पाटील आष्टीकर

उबाठा गटातून वेगळा मार्ग निवडलेले खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आपल्या भूमिकेवर पहिल्यांदाच जाहीर आणि परखड भाष्य केले आहे. ते म्हणाले, "आम्ही १८ जूनपर्यंत कुठेही गेलो नव्हतो. मात्र, वर्धापन दिनाच्या मेळाव्यात आमच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका करण्यात आली, त्याने आमची मने दुखावली गेली. गेल्या अनेक दिवसांपासून सत्तेशिवाय मतदारसंघात कुठलीही विकासकामे होत नाहीत, हे आपण पाहत आहोत. लोकांनी मला ज्या आशेने खासदार म्हणून निवडून दिले आहे, त्यांची ती कामे पूर्ण व्हावीत म्हणूनच मी हे पाऊल उचलले आहे. सत्तेत असल्याशिवाय लोकांचे प्रश्न सुटत नव्हते.""मी माझ्या कामातून नाराज कार्यकर्त्यांना दाखवून देईन की, मी दुसरीकडे कुठेही गेलो नसून शिवसेनेतून शिवसेनेतच गेलो आहे. मी माझी मूळ विचारधारा सोडलेली नाही. कार्यकर्त्यांनी राग व्यक्त करावा, पण कुणीही असंवैधानिक बोलू नये. संजय राऊत म्हणाले की 'झोडून काढा'; हरकत नाही, ते माझ्या वडिलांसारखे आहेत, त्यांनी बोलायला अडचण नाही. मात्र, झोडून काढू म्हटले तरी कोणीही कोणाला कमी समजू नये, त्याचे परिणाम वाईट होतात", असा इशाराही त्यांनी दिला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा