Friday, June 19, 2026

Omraje Nimbalkar : भावनिकदृष्ट्या चुकीचा निर्णय, पण राजकीयदृष्ट्या बरोबर - ओमराजे निंबाळकर

Omraje Nimbalkar : भावनिकदृष्ट्या चुकीचा निर्णय, पण राजकीयदृष्ट्या बरोबर - ओमराजे निंबाळकर

मुंबई : उबाठा गटात झालेल्या बंडानंतर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी अखेर आपले मौन सोडले आहे. "भावनिकदृष्ट्या विचार केल्यास पक्ष सोडण्याचा निर्णय चुकीचा वाटतो, पण राजकीयदृष्ट्या आणि मतदारसंघाच्या हितासाठी तोच बरोबर आहे," अशी कबुली देत ओमराजे यांनी उबाठा पक्षनेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवले. आपण सध्या पुण्यात असून २० जून रोजी वडिलांच्या (पवनराजे निंबाळकर) हत्येच्या खटल्याचा निकाल लागल्यानंतर, धाराशिवमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करू आणि त्यानंतरच आपला अंतिम निर्णय जाहीर करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या संभाव्य पक्षांतराच्या मागे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा ओमराजे यांनी फेटाळून लावली. ते म्हणाले, "पैसे घेतल्याची चर्चा धादांत खोटी आणि तथ्यहीन आहे. माझ्यासाठी सत्ता आणि पैसा नेहमीच गौण राहिले आहेत. हा निर्णय पैशांसाठी नाही, तर मतदारसंघातील विकासकामे आणि माझ्याकडे अपेक्षेने पाहणाऱ्या मतदारांसाठी आहे. जर हीच स्थिती राहिली, तर भविष्यात माझ्या स्वतःच्या राजकीय अस्तित्वालाच मोठा धोका निर्माण होईल. अशा वेळी लोकप्रतिनिधी म्हणून मी काय करावे?" असा उद्विग्न सवाल त्यांनी उपस्थित केला.

महायुती आणि उबाठा पक्षनेतृत्त्वामधील स्पष्ट फरक सांगताना ओमराजे म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे इतके संख्याबळ असतानाही ते शांत बसलेले नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आता विधान परिषदेच्या निवडणुकीतही ते स्वतः मैदानात उतरून फिरत आहेत. दुसरीकडे, प्रकृती अस्वास्थ्यामुळे उद्धव ठाकरे यांना फिरणे शक्य नाही हे मी समजू शकतो, पण किमान आदित्य ठाकरेंनी तरी राज्यभर फिरायला हवे होते. कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे होती, पण दुर्दैवाने उबाठा तसे कुठेच झाले नाही."

'कोरड्या' हाताने मी कधीपर्यंत फिरणार?

ओमराजे म्हणाले, "लोकांना शेतरस्ते हवे आहेत, पूल हवे आहेत. गावात वीजेचा डीपी (रोहित्र) बसवण्यासाठी मी स्वतः तीन-तीन वेळा प्रस्ताव देऊनही विरोधी बाकांवर असल्यामुळे कामे होत नाहीत. आमच्याकडे ना निधी असतो, ना काम करता येते. समोर सत्ता आणि पैसा आहे, माझ्याकडे पक्षाविषयी निष्ठा असूनही जर लोकांची कामेच करता येत नसतील, तर मी लोकांसमोर कोणत्या तोंडाने जाऊ? शेवटी कोरड्या हाताने मी कधीपर्यंत फिरणार? त्यामुळे आता विकासकामांसाठी दुसरा पर्यायच उरत नाही", असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >