Monday, June 15, 2026

A 'death trap' in Tandulwadi : १० वर्षांपूर्वीचा भीषण इतिहास पुन्हा; ८ जणांचा जीव घेणाऱ्या विहिरीवर प्रशासनाचा निष्काळजीपणा?

A 'death trap' in Tandulwadi : १० वर्षांपूर्वीचा भीषण इतिहास पुन्हा; ८ जणांचा जीव घेणाऱ्या विहिरीवर प्रशासनाचा निष्काळजीपणा?

माळशिरस (सोलापूर): म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिराचे दर्शन घेऊन पंढरपूरच्या दिशेने परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप वाहनाचा रविवारी तांदुळवाडी (ता. माळशिरस) गावाजवळ झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण राज्य हादरले आहे. या दुर्दैवी घटनेत ५ महिला, एका ६ महिन्यांच्या चिमुकल्यासह एकूण ८ जणांचा मृत्यू झाला, तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत सर्व भाविक पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी असून ते एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे.

काय घडली घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी साडेचार ते पाचच्या सुमारास हे कुटुंब पिकअप वाहनातून प्रवास करत होते. तांदुळवाडी गावानजीक वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन थेट रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळले. विहिरीला कोणतीही संरक्षक भिंत नसल्यामुळे गाडी थेट पाण्यात गेली. अपघाताच्या वेळी प्रत्यक्षदर्शी इरफान मुजावर यांनी प्रसंगावधान राखत आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने मदतकार्य सुरू केल्याने काही जणांचे प्राण वाचवता आले.

१० वर्षांपूर्वीची तीच विहीर, पुन्हा तीच शोकांतिका

या घटनेने स्थानिक नागरिकांच्या जुन्या जखमा पुन्हा ताज्या केल्या आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे दहा वर्षांपूर्वी याच ठिकाणी जागरण-गोंधळ कार्यक्रमासाठी जाणाऱ्या कलाकारांच्या जीपचा भीषण अपघात झाला होता. त्या दुर्घटनेतही सहा जणांचा मृत्यू झाला होता. एकाच ठिकाणी दोन वेळा अशा भीषण दुर्घटना घडल्याने आणि प्रशासनाने त्यानंतरही योग्य त्या सुरक्षा उपाययोजना न केल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती

वारंवार अपघात घडणाऱ्या या ठिकाणी संरक्षक भिंत (Parapet Wall), इशारा फलक आणि रस्ते सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ अनेक वर्षांपासून करत होते. मात्र, प्रशासनाने या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

या अपघातानंतर आता प्रशासनाने खालील पावले उचलली आहेत:

  • सोलापूर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी या घटनेच्या चौकशीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पाच सदस्यीय समिती नेमली आहे.

  • ही समिती अपघात नेमका कसा झाला, जबाबदार कोण आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याचा अहवाल देणार आहे.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

"विहिरीला कोणतीही संरक्षक भिंत नव्हती, आम्ही वारंवार मागणी करूनही प्रशासनाने काहीच केले नाही," अशी खंत स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या घटनेने आता 'सुरक्षा भिंत' नसलेल्या खुल्या विहिरींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >