Monsoon Update : देशात पावसाची 64 टक्के तूट; महाराष्ट्रासह 16 राज्यांत पावसाची प्रतीक्षा

मुंबई : भारतात नैऋत्य मोसमी पावसाचा वेग मंदावला आहे. सोमवार, 15 जून रोजीच्या उपग्रह प्रतिमांमध्ये देशाच्या मोठ्या भागावर मोसमी ढगांचा अभाव दिसून आला. हवामान विभागाच्या मते, 4 ते 15 जून दरम्यान देशात सरासरी 53.7 मिमी पाऊस पडायला हवा होता, परंतु केवळ 19.2 मिमी पाऊस झाला, ज्यामुळे पावसाची 64 टक्के तूट निर्माण झाली आहे. मोसमी पावसाच्या मंदावण्यामुळे राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्लीसह 16 राज्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा वाढली आहे. दक्षिण भारतातून पुढे सरकल्यानंतर, मोसमी पाऊस महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या आसपास थांबला आहे. ईशान्येकडील राज्यांमधून पुढे सरकल्यानंतर, तो बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये थांबला आहे.



कोकणात आल्यानंतर थांबलेल्या मान्सूनमध्ये प्रगती होण्याची आशा असतानाच सॅटेलाईटने टिपलेल्या छायाचित्रांनी काहीसी चिंता वाढवली आहे. उपग्रहाच्या फोटोंमध्ये मान्सून भारतातून पूर्णपणे गायब झाल्यासारखा दिसत आहे. देशाच्या दक्षिण आणि मध्य भागात मोसमी पाऊस पोहोचल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पावसाच्या गतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. १५ जून रोजी 'इन्सॅट-३डीएस' (INSAT-3DS) या उपग्रहाने टिपलेल्या फोटोंमध्ये ही परिस्थिती अधिकच स्पष्टपणे समोर आली आहे. सक्रिय मान्सूनशी संबंधित असलेला ढगांचा मोठा थर दिसण्याऐवजी, बहुतांश द्वीपकल्पीय आणि मध्य भारतात आकाश असामान्यपणे निरभ्र दिसत आहे. ढगांची मुख्य हालचाल हिमालय, ईशान्य भारत आणि इंडो-गंगेच्या खोऱ्यात उत्तरेकडील भागांवर केंद्रित झाली आहे. दुसरीकडे अरबी समुद्रातील मान्सूनची शाखाही कमकुवत आणि विखुरलेली दिसत आहे.



मागील काही दिवसांमध्ये मान्सूनने कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि मध्य भारताच्या काही भागांत प्रगती केली असली, तरी हा वेग चिंता वाढावी इतका मंदावला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, मूळ कारण आजूबाजूच्या समुद्रातील आर्द्रतेच्या कमतरतेची नसून, जमिनीपासून काही किलोमीटर वर (उच्च वातावरणात) सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणावरील संघर्षाचे आहे. या समस्येच्या केंद्रस्थानी पश्चिमेकडून वाहणारा वेगवान वायू प्रवाह आहे. उच्च वातावरणातील हा वेगाने वाहणारा हवेचा प्रवाह नेहमीपेक्षा खूपच दक्षिणेकडे सरकला आहे. या असामान्य बदलामुळे पूर्वेकडून वाहणार वेगवान वायू सक्रिय होण्यात अडथळा येत आहे, जो भारतातील मान्सूनचे चक्र टिकवून ठेवण्यासाठी मुख्य इंजिन म्हणून काम करतो.



पुढील दोन दिवसांचा हवामान अंदाज पाहिल्यास १६ जून रोजी बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पावसाची शक्यता आहे. बिहारच्या काही भागांत ताशी ५०-७० किमी वेगाने जोरदार वारे वाहू शकतात. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि तामिळनाडू, पुद्दुचेरी व कर्नाटकच्या काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. अनेक भागांत ताशी ४०-६० किमी वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच १७ जून रोजी सिक्कीम, उत्तर बंगाल, आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये जोरदार वाऱ्यांसह (ताशी ४०-६० किमी) पाऊस पडू शकतो. झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही भागांत पाऊस सुरू राहू शकतो.



महाराष्ट्राच्या काही भागांत १७ जूनपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मराठवाड्यात १७ जूनपर्यंत आणि विदर्भात १६ जूनपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोकण आणि गोव्यामध्ये १७ जूनपर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. तसेच, कोकण आणि गोव्याच्या काही भागांत १६ जूनपर्यंत रात्रीच्या वेळीही उष्ण हवामान कायम राहण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Census : राज्यातील जनगणनेचा पहिला टप्पा यशस्वी

मुंबई : जनगणना 2027 साठी महाराष्ट्रात गृहसूची आणि गृह गणनेचा पहिला टप्पा यशस्वी पूर्ण; राज्यभरात 16 मे ते 14 जून 2026 या

Pre-Monsoon Preparations : ठाणे जिल्ह्यातील रस्ते कामांना गती देण्याचे निर्देश

सर्व मनपानी आपापल्या क्षेत्रातील क्लस्टर पुनर्विकासाला प्राधान्य द्यावे एमएसईबीची प्रलंबित कामे तत्काळ

Eknath Shinde : मुंबईतील पावसाळापूर्व तयारीचा उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला आढावा

मुंबई परिसरात ‘शून्य जीवितहानी’ उद्दिष्ट ठेवून यंत्रणांनी समन्वयातून काम करावे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Mumbai Metropolitan Region : आता एकाच तिकिटावर करा संपूर्ण 'एमएमआर'मध्ये बस प्रवास!

राज्य सरकारकडून अभ्यास गट स्थापन; मार्गांचे सुसूत्रीकरण आणि ‘टेलिस्कोपिक भाडे’ रचनेवर होणार काम मुंबई : मुंबई

Smart Meter : स्मार्ट मीटरवर मोठा निर्णय येणार? जयंत पाटील-फडणवीस भेट चर्चेत

मुंबई : राज्यात जुन्या मीटरच्या जागी बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य घरगुती ग्राहक आणि

ST Corporation : वाढत्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या हंगामी भाडेवाढीस १ महिन्याची मुदतवाढ

मुंबई, : वाढत्या इंधन खर्चामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळावर पडणारा आर्थिक भार लक्षात घेऊन