Artificial intelligence (AI) : एआयने शोधली कंत्राटदारांची हातचलाखी

नालेसफाई कामांमध्ये कंपन्यांना ९.२५ कोटी रुपयांचा दंड


मुंबई : नाले स्वच्छतेच्या कामात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीच्या माध्यमातून शोधण्यात आलेल्या त्रुटींबाबत आणि निविदा अटी शर्तीनुसार यंत्रसामुग्री तैनात करण्याकामी झालेल्या विलंबाबाबत मुंबई महानगरपालिकेने कंत्राटदारांविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. तसेच, संबंधित कंत्राटदारांना तब्बल ९ कोटी २५ लाख ७२ हजार ८३० रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही दंडात्मक रक्कम कंत्राटदाराच्या देयकांमधून (Bill) वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे AI ने कंत्राटदारांची हातचलाखी पकडल्याने आजवरच्या तुलनेत प्रथम प्रथमच पावसाळ्यापूर्वी केलेल्या कामांवर मोठ्याप्रमाणात दंडाची कारवाई केली आहे.


महानगरपालिका आयुक्‍त आश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांच्या निर्देशानुसार, पर्जन्‍य जलवाहिन्‍या विभागाने ही कारवाई केली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मार्चच्‍या पहिल्‍या आठवड्यात नाल्‍यांतून गाळ काढण्‍याची कामे वेगाने सुरू करण्‍यात आली. या नालेस्वच्छतेच्या कामांवर प्रभावी देखरेख ठेवण्‍याच्या सूचना महानगरपालिका आयुक्‍त आश्विनी भिडे यांनी यंत्रणेला दिल्या आहेत. गाळ काढण्याची कामे योग्यरित्या होण्यासह त्यावर देखरेख करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासनाने मागील वर्षापासून कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून नाले स्वच्छतेच्या कामावर बारकाईने देखरेख ठेवली जात आहे. त्यानुसार, या कामांसाठी छायाचित्रण समवेत ३० सेकंदाचे चित्रीकरण (व्हिडिओ) बंधनकारक केले आहे. तर लहान नाल्यांमधून गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण करणे अनिवार्य केले आहे. गाळ उपसासंदर्भात प्राप्त होणाऱ्या सर्व व्हिडिओंचे महानगरपालिका प्रशासनाकडून कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीच्या मदतीने विश्लेषण केले जात आहे. त्याद्वारे नाल्यातील गाळ उपसा करण्याच्या कामांची योग्य देखरेख करणे, कामांमध्ये संपूर्ण पारदर्शकता राखणे यासाठी प्रशासनाला मदत होत आहे.



नालेसफाईच्या कामांमध्ये आवश्यक संयंत्रे, यंत्रसामग्री व वाहनांची अपुरी उपलब्धता, मनुष्यबळाची कमतरता, नाले स्वच्छतेचे काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षा साधनांचा पुरवठा न करणे, उपसलेल्या गाळावर विहित पद्धतीने प्रक्रिया न करणे तसेच कामे संथ गतीने करून निर्धारित वेळापत्रकाचे पालन न करणे, अशा विविध प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या आहेत.


ए. आय. आधारित तपासणी, डिजिटल पुराव्यांची पडताळणी आणि प्रत्यक्ष स्थळ तपासणी यामुळे कामांमधील त्रुटी वेळेत उघडकीस आल्याने संबंधित कंत्राटदारांवर आर्थिक जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. कामातील त्रुटीनुसार दंड रक्‍कम निश्चित करण्‍यात आली असून कंत्राटदारांच्‍या देय रकमेतून दंड रक्कम वसूल करण्यात येत आहे.


अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर म्हणाले की, नाले स्वच्छता कामांमध्ये एआय आधारित देखरेख आणि प्रत्यक्ष स्थळ तपासणी या दोन्ही यंत्रणांमुळे त्रुटी प्रभावीपणे उघडकीस आल्या आहेत. विशेषतः स्थळ तपासणी आणि व्हिडिओ अपलोड न करणे ही दंडात्मक कारवाईची प्रमुख कारणे ठरली. AI-आधारित आढळलेल्या त्रुटींद्वारे ८ कोटी ९९ लाख २६ हजार ८३० रुपये दंड आकारण्यात आला आहे. तसेच प्रत्येक त्रुटीयुक्त फेरीसाठी १ हजार रुपये प्रमाणे २६ लाख ४६ हजार रुपयांचा अतिरिक्त दंड याप्रकारे तब्बल ९ कोटी २५ लाख ७२ हजार ८३० रुपयांचा दंड ठोठावला असल्याचे अभिजीत बांगर यांनी नमूद केले आहे. या कारवाईचा उद्देश एकंदर नाले स्वच्छतेच्या कामकाजात गैरप्रकार खपून घेणार नाही, हा संदेश देणे हा असून यापुढेही जर काही त्रुटी आढळून आल्या तर महानगरपालिका प्रशासन टोकाची भूमिका घेईल,असेही नमुद केले.



अशाप्रकारे आकारली दंडाची रक्कम


मोठे नाले (१ कोटी ३९ लाख ३९ हजार ३८० रुपये)


लहान नाले (६ कोटी ११ लाख ८६ हजार ९५० रुपये)


मिठी नदी (१ कोटी ४८ लाख ५०० रुपये)


प्रत्येक त्रुटीयुक्त फेरीसाठी १ हजार रुपये प्रमाणे २६ लाख ४६ हजार रुपयांचा अतिरिक्त दंड

Comments
Add Comment

Mhada: म्हाडातर्फे १३ जुलै रोजी १९ वा लोकशाही दिन साजरा होणार

मुंबई(Mumbai) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (Mhada) एकोणीसावा लोकशाही दिन सोमवार १३ जुलै २०२६

Government of Maharashtra : 'आपत्तीवर वॉर मोड'! पावसाळी संकटाशी लढण्यासाठी महाराष्ट्र शासन सज्ज; मोशी, पालघरसह राज्यभर बचावकार्य वेगात

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर, भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तींच्या

Water Management : धरण ओव्हरफ्लो, तरी पाणीटंचाई कायम!

मुंबई(Mumbai) : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रांत पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणातील

Weather Update : बंगालच्या उपसागरातील ढग निवळले,राज्यातील पावसाचा जोर ओसरणार; पुणे, सातारा घाटमाथ्याला 'ऑरेंज अलर्ट'

मुंबई(Mumbai) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थैमान घालणाऱ्या पावसाचा जोर आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र,

Central Railway : लोणावळा–कर्जत रेल्वेमार्गावरील भूस्खलनाचा मोठा परिणाम! डेक्कन क्वीनसह अनेक एक्सप्रेस गाड्या १७ जुलैपर्यंत रद्द

मुंबई : मुसळधार पावसामुळे लोणावळा–कर्जत घाट विभागात झालेल्या भीषण भूस्खलनाचा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला

Nitesh Rane : जळगाव जामोदमध्ये फिशिंग क्लस्टर उभारणीसाठी सकारात्मक प्रयत्न; मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन

मुंबई : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये अत्याधुनिक फिशिंग क्लस्टर विकसित