नालेसफाई कामांमध्ये कंपन्यांना ९.२५ कोटी रुपयांचा दंड
मुंबई : नाले स्वच्छतेच्या कामात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीच्या माध्यमातून शोधण्यात आलेल्या त्रुटींबाबत आणि निविदा अटी शर्तीनुसार यंत्रसामुग्री तैनात करण्याकामी झालेल्या विलंबाबाबत मुंबई महानगरपालिकेने कंत्राटदारांविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. तसेच, संबंधित कंत्राटदारांना तब्बल ९ कोटी २५ लाख ७२ हजार ८३० रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही दंडात्मक रक्कम कंत्राटदाराच्या देयकांमधून (Bill) वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे AI ने कंत्राटदारांची हातचलाखी पकडल्याने आजवरच्या तुलनेत प्रथम प्रथमच पावसाळ्यापूर्वी केलेल्या कामांवर मोठ्याप्रमाणात दंडाची कारवाई केली आहे.
महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांच्या निर्देशानुसार, पर्जन्य जलवाहिन्या विभागाने ही कारवाई केली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मार्चच्या पहिल्या आठवड्यात नाल्यांतून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू करण्यात आली. या नालेस्वच्छतेच्या कामांवर प्रभावी देखरेख ठेवण्याच्या सूचना महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी यंत्रणेला दिल्या आहेत. गाळ काढण्याची कामे योग्यरित्या होण्यासह त्यावर देखरेख करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासनाने मागील वर्षापासून कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून नाले स्वच्छतेच्या कामावर बारकाईने देखरेख ठेवली जात आहे. त्यानुसार, या कामांसाठी छायाचित्रण समवेत ३० सेकंदाचे चित्रीकरण (व्हिडिओ) बंधनकारक केले आहे. तर लहान नाल्यांमधून गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण करणे अनिवार्य केले आहे. गाळ उपसासंदर्भात प्राप्त होणाऱ्या सर्व व्हिडिओंचे महानगरपालिका प्रशासनाकडून कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीच्या मदतीने विश्लेषण केले जात आहे. त्याद्वारे नाल्यातील गाळ उपसा करण्याच्या कामांची योग्य देखरेख करणे, कामांमध्ये संपूर्ण पारदर्शकता राखणे यासाठी प्रशासनाला मदत होत आहे.
मुंबई : भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यावर्षी एल निनो परिस्थितीचा प्रभाव राहण्याची शक्यता असून, पर्जन्यमानात घट ...
नालेसफाईच्या कामांमध्ये आवश्यक संयंत्रे, यंत्रसामग्री व वाहनांची अपुरी उपलब्धता, मनुष्यबळाची कमतरता, नाले स्वच्छतेचे काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षा साधनांचा पुरवठा न करणे, उपसलेल्या गाळावर विहित पद्धतीने प्रक्रिया न करणे तसेच कामे संथ गतीने करून निर्धारित वेळापत्रकाचे पालन न करणे, अशा विविध प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या आहेत.
ए. आय. आधारित तपासणी, डिजिटल पुराव्यांची पडताळणी आणि प्रत्यक्ष स्थळ तपासणी यामुळे कामांमधील त्रुटी वेळेत उघडकीस आल्याने संबंधित कंत्राटदारांवर आर्थिक जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. कामातील त्रुटीनुसार दंड रक्कम निश्चित करण्यात आली असून कंत्राटदारांच्या देय रकमेतून दंड रक्कम वसूल करण्यात येत आहे.
अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर म्हणाले की, नाले स्वच्छता कामांमध्ये एआय आधारित देखरेख आणि प्रत्यक्ष स्थळ तपासणी या दोन्ही यंत्रणांमुळे त्रुटी प्रभावीपणे उघडकीस आल्या आहेत. विशेषतः स्थळ तपासणी आणि व्हिडिओ अपलोड न करणे ही दंडात्मक कारवाईची प्रमुख कारणे ठरली. AI-आधारित आढळलेल्या त्रुटींद्वारे ८ कोटी ९९ लाख २६ हजार ८३० रुपये दंड आकारण्यात आला आहे. तसेच प्रत्येक त्रुटीयुक्त फेरीसाठी १ हजार रुपये प्रमाणे २६ लाख ४६ हजार रुपयांचा अतिरिक्त दंड याप्रकारे तब्बल ९ कोटी २५ लाख ७२ हजार ८३० रुपयांचा दंड ठोठावला असल्याचे अभिजीत बांगर यांनी नमूद केले आहे. या कारवाईचा उद्देश एकंदर नाले स्वच्छतेच्या कामकाजात गैरप्रकार खपून घेणार नाही, हा संदेश देणे हा असून यापुढेही जर काही त्रुटी आढळून आल्या तर महानगरपालिका प्रशासन टोकाची भूमिका घेईल,असेही नमुद केले.
रत्नागिरी : वाढती प्रवासी आणि मालवाहतूक, वारंवार विस्कळीत होणारे वेळापत्रक आणि गणेशोत्सव काळातील अतिरिक्त गाड्यांचे नियोजन या आव्हानांमुळे कोकण ...
अशाप्रकारे आकारली दंडाची रक्कम
मोठे नाले (१ कोटी ३९ लाख ३९ हजार ३८० रुपये)
लहान नाले (६ कोटी ११ लाख ८६ हजार ९५० रुपये)
मिठी नदी (१ कोटी ४८ लाख ५०० रुपये)
प्रत्येक त्रुटीयुक्त फेरीसाठी १ हजार रुपये प्रमाणे २६ लाख ४६ हजार रुपयांचा अतिरिक्त दंड





