Saturday, June 13, 2026

Kalyan ST Bus : आगार स्थलांतरामुळे एसटी प्रवाशांचे हाल; सहा महिन्यांपासून विठ्ठलवाडीपर्यंतच प्रवास

Kalyan ST Bus : आगार स्थलांतरामुळे एसटी प्रवाशांचे हाल; सहा महिन्यांपासून विठ्ठलवाडीपर्यंतच प्रवास

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक परिसरात सुरू असलेल्या 'स्मार्ट सिटी' प्रकल्प आणि उड्डाणपूल बांधकामामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यातच मुख्य एसटी आगाराचे तात्पुरते स्थलांतर विठ्ठलवाडी येथे करण्यात आल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या हजारो प्रवाशांना गेल्या सहा महिन्यांपासून मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

कल्याण पश्चिमेकडे जाणाऱ्या प्रवाशांना आता थेट एसटी आगारात उतरता येत नसून अनेक बसगाड्या पत्रीपूल, नेतिवली नाका किंवा सूचक नाका परिसरातच प्रवाशांना उतरवत आहेत. परिणामी सामानासह प्रवास करणाऱ्या नागरिकांना अतिरिक्त खर्च आणि त्रास सहन करावा लागत आहे.

रिक्षासाठी मोजावे लागतात अतिरिक्त पैसे :

एसटी बसमधून अर्ध्या रस्त्यात उतरवल्यानंतर प्रवाशांना कल्याण रेल्वे स्थानक किंवा शहरातील अन्य भागात पोहोचण्यासाठी रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. यासाठी १०० ते १५० रुपये भाडे आकारले जात असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे. विशेषतः कोकण, अहिल्यानगर, बीड, उस्मानाबाद आणि इतर दूरवरच्या भागांतून येणाऱ्या प्रवाशांकडे मोठ्या प्रमाणात सामान असते. अशा वेळी अर्ध्या रस्त्यात उतरावे लागल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे.

पाच वर्षांपासून प्रकल्प रखडला :

होणार होते मात्र ते अजून सुरु झालेले नाही.कल्याण स्टेशन परिसरातील 'सॅटीस' आणि परिसर विकास प्रकल्पाचे काम २०२१ पासून सुरू आहे. या प्रकल्पाअंतर्गत एसटी आगाराचे आधुनिकीकरण आणि बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. मात्र, पाच वर्षे उलटूनही प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. 

बाहेरगावच्या गाड्यांना प्रवेशबंदी :

अहिल्यानगर, बीड, धाराशिव, कोकण आणि अन्य भागांतून येणाऱ्या एसटी बसला सध्या कल्याण डेपोमध्ये प्रवेश दिला जात नाही. या बसगाड्या गोविंदवाडी किंवा पत्रीपूल मार्गे थेट विठ्ठलवाडी आगारात पाठवल्या जातात. यामुळे कल्याण पश्चिमेकडे जाणाऱ्या प्रवाशांना मधल्या मार्गात उतरावे लागते आणि त्यानंतर खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते.

डिसेंबर २०२६ पर्यंत काम पूर्ण होण्याची अपेक्षा :

आगार व्यवस्थापक चेतन देवधर यांनी सांगितले की, कल्याण आगाराचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. प्रशासनाने डिसेंबर २०२६ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य दिले असून त्यानंतर प्रवाशांना पुन्हा कल्याण आगारातूनच सेवा उपलब्ध होईल. तोपर्यंत मात्र हजारो एसटी प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा