Thursday, June 11, 2026

Hinjawadi-Shivajinagar Metro: स्थानके अजूनही 'यार्डातच'; अपूर्ण कामांमुळे पुणेकरांच्या आशा मावळल्या

Hinjawadi-Shivajinagar Metro: स्थानके अजूनही 'यार्डातच'; अपूर्ण कामांमुळे पुणेकरांच्या आशा मावळल्या

PUNE : हिंजवडी आयटी हबला दिलासा देण्यासाठी प्रस्तावित असलेला हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून विलंबाच्या भोवऱ्यात अडकला आहे. प्रशासनाकडून वारंवार मेट्रो सुरू करण्याचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात स्थानकांची अवस्था दयनीय असून कामे अजूनही अर्धवट आहेत. 'सकाळ'ने केलेल्या पाहणीतून स्थानके अद्याप 'यार्डातच' असल्याचे चित्र समोर आले आहे.

सहावेळा मुहूर्त टळला, पण कामे 'जैसे थे' नोव्हेंबर २०१९ पासून सुरू झालेल्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील (हिंजवडी ते बाणेर) प्रवासी वाहतुकीचा मुहूर्त आतापर्यंत सहावेळा पुढे ढकलण्यात आला आहे. पाहणीत असे दिसून आले की, बॅग तपासणी यंत्रणा, तिकीट व्हेंडिंग मशिन, लिफ्ट आणि स्वयंचलित दरवाजे आणून ठेवले असले, तरी बहुतांश ठिकाणी ते कार्यान्वित नाहीत.

स्थानकांची सद्यस्थिती पाहणी केलेल्या सहा प्रमुख स्थानकांची स्थिती चिंताजनक असून सर्वच ठिकाणी १५ ते २० टक्के कामे प्रलंबित आहेत:

  • मेगापॉलिस सर्कल (माण): प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण असले तरी, सिलिंग, मार्बल आणि काचेचे काम अर्धवट आहे. तिकीट मशिनही बसवलेले नाहीत.

  • क्वॉड्रन कंपनी (एमआयडीसी): येथे सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. सुरक्षा भिंतीचे काम अपूर्ण असून पदपथावर पेव्हिंग ब्लॉक्सही नाहीत.

  • डोलहर कंपनी (माण बस डेपो): रंगकाम आणि वायरिंगची कामे बाकी आहेत. प्रवेशद्वारावर खोदकाम असल्याने येण्या-जाण्यासाठी अडथळे आहेत.

  • इन्फोसिस (हिंजवडी फेज-२): येथील काही जिने अर्धवट आहेत, तर काही ठिकाणी काच आणि एसएस सीट लावण्याचे काम पूर्ण झालेले नाही.

  • विप्रो चौक (हिंजवडी फेज-२): स्थानकाखालील ड्रेनेजची कामे अपूर्ण असल्याने परिसरात समस्या निर्माण होऊ शकते. रेलिंगची कामेही अर्धवट आहेत.

  • पद्मभूषण चौक (हिंजवडी फेज-२): येथे स्वच्छतागृहाची सोय नाही, मार्बल बसवलेले नाहीत आणि महत्त्वाचे मार्गदर्शक सूचना फलकही गायब आहेत.

प्रशासकीय 'स्टंटबाजी' की कामाची गती? पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी अलीकडेच मेट्रो स्थानकांना भेटी देऊन सूचना दिल्या. परंतु, या भेटी केवळ ‘स्टंटबाजी’ ठरत असून कामाला कोणतीही गती मिळालेली नाही, अशी टीका होत आहे.

आयटी कर्मचाऱ्यांची कोंडी कायम हिंजवडी आयटी पार्कमध्ये दररोज लाखो कर्मचारी कामासाठी येतात. गेली १०-१२ वर्षे हा परिसर वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकला आहे. मेट्रोमुळे यातून सुटका होईल, ही अपेक्षा आता धुसर होत चालली आहे. प्रशासनाने केवळ आश्वासने न देता, विशेष कृती आराखडा राबवून प्रकल्प तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. जोपर्यंत सर्व सुविधा १०० टक्के कार्यान्वित होत नाहीत, तोपर्यंत पुणेकरांच्या अपेक्षा वाढवणे चुकीचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >