कथा दोन पंतप्रधानांची

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या ४,३९७ दिवसांच्या अखंड कार्यकाळाचा टप्पा पार करून विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतिहास रचला आहे. लेखक बर्जिस देसाई यांनी या लेखात नेहरू आणि मोदी या देशाच्या दोन महानायकांच्या कालखंडाचा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्यपद्धतीचा अत्यंत मार्मिक वेध घेतला आहे.एकीकडे आलिशान महालात, पाश्चात्य प्रभावात आणि फॅबियन समाजवादी विचारसरणीत वाढलेले नेहरू होते; तर दुसरीकडे रेल्वे स्टेशनवरील चहाच्या दुकानातून, गरिबीचे चटके सोसत आणि जमिनीशी नाळ जोडून शून्यातून विश्व निर्माण करणारे नरेंद्र मोदी आहेत. हा लेख केवळ दोन व्यक्तींची तुलना करत नाही, तर त्यांचे संगोपन, मानसिकता, श्रद्धा, निर्णयक्षमता आणि राष्ट्रीय दृष्टिकोनातील परस्परविरोधी तफावत अत्यंत प्रखरपणे समोर आणतो.


 

जवाहरलाल यांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केल्याप्रमाणे, लहानपणी आपल्या वडिलांना 'रेड क्लॅरेट' नावाची इंपोर्टेड लाल वाईन पिताना पाहून ते अवाक् झाले होते, कारण त्यांना ते रक्त वाटले होते. दुसरीकडे, लहानग्या नरेंद्र यांनी आपल्या आईला काचमिश्रित राखेने इतरांची भांडी घासताना पाहिले होते, ज्यामुळे अनेकदा त्यांच्या आईच्या बोटांमधून रक्त यायचे.नेहरूंच्या अस्खलित इंग्रजी उच्चारांमुळे ते उच्चभ्रू वर्गाचे लाडके बनले, ज्यांना नेहरू हे त्यांच्यातलेच एक वाटायचे. आपल्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेबद्दल कमालीचे जागरूक असलेल्या नेहरूंनी, देशाकडे त्यांच्या फॅबियन समाजवादी विचारसरणीच्या चष्म्यातून पाहिले, ज्याची मोठी किंमत देशाला मोजावी लागली. त्यांनी काश्मीरचे भारतात विलीनीकरण करण्यात कमालीचा उशीर केला, सार्वमताचे आश्वासन दिले, हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेला आणि नंतर कायमस्वरूपी 'पाकिस्तान व्याप्त काश्मीर' बनलेल्या भागावर ताबा मिळवण्यास भारतीय सैन्याला परवानगी नाकारली. चिनी लोकांवर आंधळा विश्वास ठेवण्याच्या त्यांच्या भाबडेपणामुळे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला अक्साई चीन भारताला गंमवावा लागला; ज्याचा त्यांनी 'एक ओसाड जमीन' म्हणून नंतर उपरोधिकपणे उल्लेख केला. त्यांनी अत्यंत एकतर्फी अशा सिंधू जल करारावर स्वाक्षरी करून पाकिस्तानला ८०% पाणी दिले आणि काही बादल्या पाण्यावरून एवढा गदारोळ कशासाठी, असे ते म्हणाले होते.

७२ वर्षांनंतर, मोदींनी काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याची अशक्यप्राय वाटणारी घटनात्मक कामगिरी करून दाखवली, ज्या दर्जाचा आडोसा घेऊन पाकिस्तान आपला घातक अपप्रचार चालवत होता. त्यांनी धाडसाने सिंधू जल कराराला स्थगिती दिली, ज्यामुळे शत्रूची मोठी कोंडी झाली आहे. त्यांनी आक्रमक आणि सुनियोजित प्रत्युत्तराचे लष्करी डावपेच आखून देशाच्या सीमा सुरक्षित केल्या. तरीही, बुद्धिजीवी उच्चभ्रूंचा एक वर्ग मोदींसारख्या भूमीपुत्राशी फटकून वागतो, जे अस्खलित इंग्रजी बोलत नाहीत. ते खूपच उत्कृष्ट कामगिरी करणारे सुपर परफॉर्मर आहेत, हे हा वर्ग मान्य करतो, पण ते 'आमच्यातले' नाहीत, अशीच त्यांची भावना असते.नरेंद्र मोदी यांची विविध कामांच्या माहितीची आकलनक्षमता विलक्षण आहे आणि त्याबाबतचे ज्ञान अतिशय कुशलतेने आत्मसात करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे, असा दाखला अनेक पिढ्यांतील सनदी अधिकाऱ्यांनी दिला आहे. ते शांतपणे ऐकून घेतात, ते जिज्ञासू आहेत आणि ते अगदी सूक्ष्म तपशिलांमध्ये जाऊन अभ्यास करतात. ते कामाचा पाठपुरावा करतात, मूल्यवहन करतात आणि निर्णय घेतात. जे पूर्वतयारीशिवाय येतात आणि कामात ढिसाळपणा करतात, अशा लोकांसाठी त्यांच्याकडे अजिबात जागा नसते.
याउलट नेहरूंना तपशिलांचा कंटाळा यायचा. ते तापट स्वभावाचे होते, भावनिक निर्णय घेण्याकडे त्यांचा कल होता, ते अत्यंत हेकेखोर स्वतःच्या मतावर ठाम राहणारे होते आणि एक सामान्य दर्जाचे प्रशासक होते. नेहरूंचा अतिशय आदर करणाऱ्या जेआरडी टाटा यांनी देखील एका रेकॉर्ड केलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, नेहरूंना अर्थशास्त्रावर चर्चा करण्यात रस नव्हता आणि अशावेळी ते आपल्या खिडकीबाहेर बागेत खेळणाऱ्या एका महाकाय पांडाकडे पाहत बसायचे.नेहरूंनी सोव्हिएत पद्धतीच्या पंचवार्षिक योजना स्वीकारल्या, ज्यामध्ये जमीन सुधारणा, धरणे आणि अवजड उद्योगांवर भर देण्यात आला होता; परंतु विकासाचे हे फायदे तळागाळातील लोकांपर्यंत कसे पोहोचतील, याचा विचार करण्यात आला नाही.



दुसरीकडे, नरेंद्र मोदी यांनी गरिबीचे वैज्ञानिक पद्धतीने उच्चाटन करण्यासाठी एका धर्मनिरपेक्ष आणि कार्यक्षम कल्याणकारी राज्यामध्ये क्रांती घडवून आणली (ज्यामध्ये मध्यस्थांना बाजूला सारून गरिबांच्या खात्यात थेट रोख रक्कम जमा करणे, स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर आणि नळाद्वारे पाणी देणे, घरासाठी थेट आर्थिक मदत, गरिबांसाठी आरोग्य विमा, जनधन बँक खात्यांद्वारे वित्तीय समावेशन, मातृत्व कल्याणासाठी थेट रोख रक्कम देणे, स्वच्छता आणि आरोग्य, तसेच महिलांसाठी स्वतंत्र शौचालये आणि अशा अनेक पुढाकारांचा समावेश आहे आणि ही यादी न संपणारी आहे). कोविड-१९ च्या काळात 'संपूर्ण सरकार हा दृष्टिकोन' आणि अगदी योग्य वेळी लॉकडाऊन लागू करण्याचा आग्रह धरून मोदींनी देशाला अस्तित्वाच्या संकटातून एकहाती वाचवले. नेहरू हे एक अमूर्त, बुद्धिवादी विचारवंत होते; तर मोदी हे एक उत्कृष्ट प्रशासक आहेत.स्वतःला नास्तिक मानणाऱ्या नेहरूंनी, नवनिर्मित सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यापासून राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना रोखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती आणि या सोहळ्याप्रसंगी राष्ट्रपतींचे होणारे भाषण प्रसारित न करण्याचे आदेश त्यांनी ऑल इंडिया रेडिओला दिले होते. याच्या अगदी उलट, मोदींनी असंख्य सांस्कृतिक प्रकल्पांच्या माध्यमातून आपल्या प्राचीन सभ्यतेच्या पुनरुत्थानाला सक्रियपणे चालना दिली आहे. कोणतेही कुटुंब नाही. मित्र नाहीत. सुट्ट्या नाहीत. पर्यटनाचे बेत नाहीत. दिवसातून किमान १६ तास काम. मोदी हे गेल्या २५ वर्षांपासून २४/७/३६५ दिवस अविरतपणे, न थांबता देशसेवेत कार्यरत असलेले एक यंत्र बनले आहेत. त्यापूर्वी, ३० वर्षे संघाचे पूर्णवेळ प्रचारक आणि भाजपचे पदाधिकारी म्हणून, म्हणजेच एकूण ५५ वर्षांचा त्यांचा सार्वजनिक सेवेचा काळ राहिला आहे. मोदींच्या चेहऱ्यावर थकव्याचा किंवा अगदी संथ होण्याचा लवलेशही दिसत नाही. ते म्हणतात की, त्यांची काम करत राहण्याची नीतीमूल्ये त्यांना प्रत्येक क्षणी उत्साही ठेवतात. मोदी हे वैश्विक शक्तीचे आभार मानतात, जिला ते 'अविरत धारा' म्हणजे नावीन्याचा, ताजेपणाचा आणि चैतन्यमय प्रवाह म्हणतात; ज्याचा अनुभव ते जगण्याच्या प्रत्येक सेकंदाला घेतात.



मोदी हे जगातील सर्वात परिश्रमी नेते असून, थेट प्रत्यक्ष सहभागाची त्यांची कार्यपद्धती आहे आणि प्रत्येक क्षेत्रातील अगदी लहानात लहान तपशिलावर त्यांची पकड आहे. वेगवेगळ्या आणि परस्परांपासून पूर्णपणे भिन्न असलेल्या विषयांवर एकाचवेळी लक्ष केंद्रित करण्याची त्यांची नैसर्गिक क्षमता खरोखरच अतर्क्य आहे. 'शिस्त माझ्या डीएनएमध्येच आहे', असे ते म्हणतात. गांधीजींनी १५ पैकी १२ प्रांतीय काँग्रेस कमिट्यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी आणि पर्यायाने पंतप्रधानपदासाठी सरदार पटेल यांच्या बाजूने दिलेला कौल नाकारून नेहरूंची निवड केली, तर उर्वरित ३ कमिट्या तटस्थ राहिल्या होत्या. पुढे, नेहरू यांनी भारताचे पहिले महान घराणेशाहीचे नेते म्हणून इंदिरा यांच्या अंतिम उत्तराधिकाराचे अतिशय बारकाने नियोजन केले.मोदींनी भाजपसाठी अनेक निवडणुका जिंकल्या, पण वयाच्या ५१व्या वर्षी पक्षाने त्यांना गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा तातडीने सांभाळण्यास सांगण्यापूर्वी त्यांनी स्वतःसाठी कधीही कोणत्याही निवडणुकीच्या पदाची मागणी केली नव्हती. मोदींना इतर बहुतांश राजकारणी आणि नेत्यांपासून वेगळे करते ती म्हणजे त्यांची हेतूची शुद्धता. सत्तेचा पाठपुरावा करणे हा त्यांचा कधीच उद्देश नव्हता. गांधीजींप्रमाणेच, सेवा आणि त्याग हे शब्द मोदींसाठी केवळ पोकळ शब्द नाहीत. येत्या काही दशकांमध्ये नरेंद्र मोदी मानबिंदू बनतील. त्यांच्यानंतर येणारे पंतप्रधान, मग ते कोणत्याही राजकीय पक्षाचे का असेनात, राजे किंवा प्रजा असो, त्यांचेच अनुकरण करण्याचा प्रयत्न करतील. कारण नरेंद्र मोदी यांनी प्रस्थापित केलेल्या मापदंडानुसारच त्या सर्वांच्या कामांचे मूल्यमापन होणार आहे.
(श्री. बर्जिस देसाई हे ‘मोदीज मिशन’ पुस्तकाचे लेखक आहेत)

Comments
Add Comment

निर्भीड पत्रकार: लोकमान्य टिळक

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज (२३ जुलै) १७० वी जयंती. त्यानिमित्त त्यांच्या पत्रकारितेच्या आठवणींना दिलेला

Municipal Corporation : ‘सिटीलिंक’वर महापौरांचा ‘सर्जिकल स्ट्राइक’

नाशिकची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली सिटीलिंक बससेवा सध्या आर्थिक

‘किंग ऑफ द नॉर्थ’पर्व

ब्रिटनच्या राजकारणात नेतृत्वबदल झाला असून, लेबर पार्टीने अँडी बर्नहॅम यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी

वाढवण प्रकल्प; आर्थिक महत्त्वाकांक्षेचे केंद्र

भारत जागतिक उत्पादन आणि पुरवठा साखळीत आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत असताना, वाढवण बंदर हे ब्ल्यू

Jayant Patil : जयंत पाटील राजकीय कसोटीच्या उंबरठ्यावर

दक्षिण महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत सर्वाधिक चर्चेत राहिलेले नाव म्हणजे राष्ट्रवादी

आंदोलनजीवी...

संसदेचे अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आणि संसदेला वादळी सुरुवात झाली. अर्थात या वेळी विरोधकांकडे भरपूर