देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या ४,३९७ दिवसांच्या अखंड कार्यकाळाचा टप्पा पार करून विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतिहास रचला आहे. लेखक बर्जिस देसाई यांनी या लेखात नेहरू आणि मोदी या देशाच्या दोन महानायकांच्या कालखंडाचा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्यपद्धतीचा अत्यंत मार्मिक वेध घेतला आहे.एकीकडे आलिशान महालात, पाश्चात्य प्रभावात आणि फॅबियन समाजवादी विचारसरणीत वाढलेले नेहरू होते; तर दुसरीकडे रेल्वे स्टेशनवरील चहाच्या दुकानातून, गरिबीचे चटके सोसत आणि जमिनीशी नाळ जोडून शून्यातून विश्व निर्माण करणारे नरेंद्र मोदी आहेत. हा लेख केवळ दोन व्यक्तींची तुलना करत नाही, तर त्यांचे संगोपन, मानसिकता, श्रद्धा, निर्णयक्षमता आणि राष्ट्रीय दृष्टिकोनातील परस्परविरोधी तफावत अत्यंत प्रखरपणे समोर आणतो.
जवाहरलाल यांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केल्याप्रमाणे, लहानपणी आपल्या वडिलांना 'रेड क्लॅरेट' नावाची इंपोर्टेड लाल वाईन पिताना पाहून ते अवाक् झाले होते, कारण त्यांना ते रक्त वाटले होते. दुसरीकडे, लहानग्या नरेंद्र यांनी आपल्या आईला काचमिश्रित राखेने इतरांची भांडी घासताना पाहिले होते, ज्यामुळे अनेकदा त्यांच्या आईच्या बोटांमधून रक्त यायचे.नेहरूंच्या अस्खलित इंग्रजी उच्चारांमुळे ते उच्चभ्रू वर्गाचे लाडके बनले, ज्यांना नेहरू हे त्यांच्यातलेच एक वाटायचे. आपल्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेबद्दल कमालीचे जागरूक असलेल्या नेहरूंनी, देशाकडे त्यांच्या फॅबियन समाजवादी विचारसरणीच्या चष्म्यातून पाहिले, ज्याची मोठी किंमत देशाला मोजावी लागली. त्यांनी काश्मीरचे भारतात विलीनीकरण करण्यात कमालीचा उशीर केला, सार्वमताचे आश्वासन दिले, हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेला आणि नंतर कायमस्वरूपी 'पाकिस्तान व्याप्त काश्मीर' बनलेल्या भागावर ताबा मिळवण्यास भारतीय सैन्याला परवानगी नाकारली. चिनी लोकांवर आंधळा विश्वास ठेवण्याच्या त्यांच्या भाबडेपणामुळे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला अक्साई चीन भारताला गंमवावा लागला; ज्याचा त्यांनी 'एक ओसाड जमीन' म्हणून नंतर उपरोधिकपणे उल्लेख केला. त्यांनी अत्यंत एकतर्फी अशा सिंधू जल करारावर स्वाक्षरी करून पाकिस्तानला ८०% पाणी दिले आणि काही बादल्या पाण्यावरून एवढा गदारोळ कशासाठी, असे ते म्हणाले होते. ७२ वर्षांनंतर, मोदींनी काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याची अशक्यप्राय वाटणारी घटनात्मक कामगिरी करून दाखवली, ज्या दर्जाचा आडोसा घेऊन पाकिस्तान आपला घातक अपप्रचार चालवत होता. त्यांनी धाडसाने सिंधू जल कराराला स्थगिती दिली, ज्यामुळे शत्रूची मोठी कोंडी झाली आहे. त्यांनी आक्रमक आणि सुनियोजित प्रत्युत्तराचे लष्करी डावपेच आखून देशाच्या सीमा सुरक्षित केल्या. तरीही, बुद्धिजीवी उच्चभ्रूंचा एक वर्ग मोदींसारख्या भूमीपुत्राशी फटकून वागतो, जे अस्खलित इंग्रजी बोलत नाहीत. ते खूपच उत्कृष्ट कामगिरी करणारे सुपर परफॉर्मर आहेत, हे हा वर्ग मान्य करतो, पण ते 'आमच्यातले' नाहीत, अशीच त्यांची भावना असते.नरेंद्र मोदी यांची विविध कामांच्या माहितीची आकलनक्षमता विलक्षण आहे आणि त्याबाबतचे ज्ञान अतिशय कुशलतेने आत्मसात करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे, असा दाखला अनेक पिढ्यांतील सनदी अधिकाऱ्यांनी दिला आहे. ते शांतपणे ऐकून घेतात, ते जिज्ञासू आहेत आणि ते अगदी सूक्ष्म तपशिलांमध्ये जाऊन अभ्यास करतात. ते कामाचा पाठपुरावा करतात, मूल्यवहन करतात आणि निर्णय घेतात. जे पूर्वतयारीशिवाय येतात आणि कामात ढिसाळपणा करतात, अशा लोकांसाठी त्यांच्याकडे अजिबात जागा नसते. याउलट नेहरूंना तपशिलांचा कंटाळा यायचा. ते तापट स्वभावाचे होते, भावनिक निर्णय घेण्याकडे त्यांचा कल होता, ते अत्यंत हेकेखोर स्वतःच्या मतावर ठाम राहणारे होते आणि एक सामान्य दर्जाचे प्रशासक होते. नेहरूंचा अतिशय आदर करणाऱ्या जेआरडी टाटा यांनी देखील एका रेकॉर्ड केलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, नेहरूंना अर्थशास्त्रावर चर्चा करण्यात रस नव्हता आणि अशावेळी ते आपल्या खिडकीबाहेर बागेत खेळणाऱ्या एका महाकाय पांडाकडे पाहत बसायचे.नेहरूंनी सोव्हिएत पद्धतीच्या पंचवार्षिक योजना स्वीकारल्या, ज्यामध्ये जमीन सुधारणा, धरणे आणि अवजड उद्योगांवर भर देण्यात आला होता; परंतु विकासाचे हे फायदे तळागाळातील लोकांपर्यंत कसे पोहोचतील, याचा विचार करण्यात आला नाही.
चंदगडचे आ. शिवाजी पाटील यांचे आवाहन Mumbai : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांनी जनतेची नाहक दिशाभूल करून त्यांची माथी भडकवत यात पक्षीय ...
MUMBAI : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्ट बसच्या अपघातांची मालिका थांबता थांबत नाहीये. दादर येथील बस अपघाताची घटना ताजी असतानाच, आता कांदिवली ...






