Wednesday, June 10, 2026

Sharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येत्या १५ दिवसांत मोठे फेरबदल होणार

Sharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येत्या १५ दिवसांत मोठे फेरबदल होणार

वर्धापनदिन कार्यक्रमात संकेत; मोदींची नेहरुंशी तुलना होऊ शकत नसल्याचे पवारांचे मत

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात येत्या १५ दिवसांत मोठे संघटनात्मक फेरबदल केले जाणार आहेत. पक्षात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आणि घराणेशाहीची पार्श्वभूमी नसलेल्या निष्ठावंत, सामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत आमदार रोहित पवार यांनी दिले आहेत. मुंबईत आयोजित पक्षाच्या वर्धापनदिन सोहळ्यात बोलताना त्यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. दरम्यान, याच सोहळ्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पंडित नेहरू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना होऊ शकत नाही, असे मत मांडले.

शरद पवार म्हणाले, "पंडित नेहरूंचे योगदान अथांग आहे, त्यांनी शून्यातून आधुनिक भारताची निर्मिती केली आहे. स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढा देण्यापासून ते देश संघटित ठेवण्यापर्यंत नेहरूंनी काम केले. त्यामुळे त्यांच्याशी नरेंद्र मोदींची तुलना कशी होऊ शकते?" असा सवाल पवारांनी केला. स्वातंत्र्यानंतर पहिल्या निवडणुकीपर्यंत आणि त्यानंतरही नेहरूंनी देशात सुधारणेचे वारे वाहते ठेवले, असेही त्यांनी सांगितले.महाराष्ट्राचा एक मंत्री पंजाबमध्ये जाऊन 'शीखांचे शिरकाण काँग्रेसच्या विचारांमुळे झाले' असे विधान करतो, हे देशाच्या ऐक्याच्या दृष्टीने अत्यंत क्लेशदायक आणि अयोग्य आहे. अशा जुन्या व कडू गोष्टी विसरून देश पुढे नेण्याची गरज असताना भाजपच्या मंत्र्यांकडून अशी चुकीची विधाने केली जात असल्याचा आरोप शरद पवारांनी केला.

'ऑपरेशन ब्लू स्टार' हा इंदिरा गांधींचा मोठा त्याग

काँग्रेस नेत्यांनी शीख समाजावर अन्याय केला, या भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांच्या विधानाचा शरद पवारांनी निषेध केला. महाजन यांचे वक्तव्य दिशाभूल करणारे असल्याचा टोला त्यांनी लगावला. पवार म्हणाले, "देशासाठी 'ऑपरेशन् ब्लू स्टार' हा इंदिरा गांधींचा खूप मोठा त्याग होता. इंदिराजींनी देशाच्या प्रतिष्ठेशी कधीही तडजोड केली नाही. जगात भारताची पत त्यांनीच वाढवली. शीख समाज हा देशाचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून, लष्करासह प्रत्येक क्षेत्रात ते हिमतीने जबाबदारी पेलतात. मात्र, काही लोकांनी तरुणांची माथी भडकावून त्यांना चुकीच्या रस्त्यावर नेले, ज्यातून जनरल वैद्य यांच्यासह अनेक निष्पाप अधिकाऱ्यांच्या हत्या झाल्या. अखेर इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनाही देशासाठी प्राणांची आहुती द्यावी लागली."

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >