Monday, June 8, 2026

KIDNAPPING : विवाहित महिलेशी संभाषणाच्या संशयातून तरुणाचे अपहरण; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने केली सुटका

KIDNAPPING : विवाहित महिलेशी संभाषणाच्या संशयातून तरुणाचे अपहरण; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने केली सुटका

BARAMATI: बारामती तालुक्यातील सुपा परिसरातून एका तरुणाचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. विवाहित महिलेशी संपर्क असल्याच्या संशयातून दोन तरुणांनी ऋषिकेश विजय चांदगुडे (रा. दंडवडी) या तरुणाला धाक दाखवून कारमधून पळवून नेले होते. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या चार तासांत या तरुणाची सुखरूप सुटका करण्यात आली.

काय घडली घटना?

शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ऋषिकेशला फोन करून बोलावण्यात आले आणि त्यानंतर लाल रंगाच्या कारमधून त्याचे अपहरण करण्यात आले. ही माहिती सुपा पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने यवत, उरुळी कांचन आणि सासवड पोलीस ठाण्यांना सतर्क करून नाकाबंदीचे आदेश दिले. यादरम्यान तांत्रिक माहितीच्या आधारे अपहृत तरुणाचे लोकेशन शोधण्यात यश आले.

थरारक शोधमोहीम आणि सुटका

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रदीप सिंह गिल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तैनात करण्यात आले होते. दिवेघाट आणि श्री मयुरेश्वर अभयारण्य परिसरात शोध घेत असताना पोलिसांना यश आले. आरोपींनी पिस्तूल आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवून तरुणाला कारमध्ये डांबून ठेवले होते. पोलिसांनी धाडसी कारवाई करत ओंकार प्रकाश भोसले (२७) आणि तन्मय सुधीर साळुंखे (२०) या दोन संशयितांना ताब्यात घेतले.

संशयाचे कारण

प्राथमिक तपासानुसार, अपहृत तरुणाचा एका विवाहित महिलेशी फोनवरून संपर्क होता, याच कारणावरून आरोपींनी रागाच्या भरात हे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून आता या प्रकरणाचा सखोल तपास केला जात असून, आरोपींच्या नेमक्या हेतूची चौकशी सुरू आहे.

पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे एका तरुणाचा जीव वाचल्याने परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >