Saturday, May 30, 2026

पाली बसस्थानकाच्या पुनर्बांधणी प्रकल्पाची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून पाहणी

पाली बसस्थानकाच्या पुनर्बांधणी प्रकल्पाची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून पाहणी

आधुनिक व सर्व सुविधांनी युक्त बसस्थानक उभारण्याचा निर्धार

पाली : राज्यातील एसटी प्रवाशांना अधिक दर्जेदार व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रा.प. पाली बसस्थानकाच्या पुनर्बांधणी प्रकल्पाची परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.पाली येथील बसस्थानकासाठी सुमारे १५ हजार ७५७ चौ.मी. क्षेत्रफळाची जागा सन १९७१ मध्ये संपादित करण्यात आली होती. या जागेवर सन १९७८ मध्ये बसस्थानकाची इमारत उभारण्यात आली होती. कालबाह्य झालेली जुनी इमारत सन २०२२ मध्ये पाडण्यात आल्यानंतर प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक सुविधांनी सज्ज नवीन बसस्थानक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून रु. १३ कोटी ९६ लाख ४४ हजार ३४६ इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.बसस्थानकाच्या जागेवर कोणतेही अतिक्रमण अथवा न्यायप्रविष्ट प्रकरण नसल्याने प्रकल्पाच्या अंमलबजावणीस कोणताही अडथळा नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली.नवीन बसस्थानकात ८ फलाटांचे सुसज्ज बसस्थानक, प्रशस्त प्रतीक्षालय, स्वतंत्र कँटीन, विद्यार्थी पासधारक व आरक्षणधारकांसाठी विशेष सुविधा, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, चालक-वाहकांसाठी विश्रामगृह, चौकशी कार्यालय, प्रशासकीय कार्यालये, दुकाने, उपहारगृह तसेच इतर विविध प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष बांधकाम कार्यास गती देण्यात येणार आहे.यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “पाली हे महत्त्वाचे धार्मिक व पर्यटन केंद्र असून येथे दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक आणि प्रवासी येत असतात. त्यामुळे आधुनिक, स्वच्छ व सर्व सुविधांनी युक्त बसस्थानक उभारून प्रवाशांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पालीच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवे स्वरूप प्राप्त होईल आणि प्रवाशांच्या सोयींमध्ये मोठी भर पडेल.”मंत्री प्रताप सरनाईक यांनी लोकांच्या मागणीचे निवेदनावर लगेच कारवाई होण्यासाठी एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांना दूरध्वनी द्वारे संपर्क साधून कल्याण- पाली ही बस लवकर सुरू करण्याची निर्देशित केले. तसेच पाली - खोपोली मार्गावर शटल सेवेच्या फेऱ्या वाढविण्यासाठी नव्या बसेस देण्याची देखील सूचना केल्या.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >