Friday, May 29, 2026

Japan Bans Indian Mangoes : जपानमध्ये हापूससह भारतीय आंब्यांना बंदी! केमिकलमुक्त प्रक्रियेत गंभीर निष्काळजीपणा उघड

Japan Bans Indian Mangoes : जपानमध्ये हापूससह भारतीय आंब्यांना बंदी! केमिकलमुक्त प्रक्रियेत गंभीर निष्काळजीपणा उघड

नवी दिल्ली : उन्हाळ्याच्या हंगामात जगभरात गोडवा पसरवणाऱ्या भारतीय आंब्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठा झटका बसला आहे. जपान सरकारने (Japan's government) चालू हंगामात भारतातून आयात होणाऱ्या सर्व ताज्या आंब्यांवर (Indian Mangos) थेट बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. जपानच्या कडक 'बायो-सिक्युरिटी' मानकांची पूर्तता करण्यात भारतीय प्रक्रिया केंद्रे अपयशी ठरल्याने हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, जवळपास २० वर्षांनंतर जपानने भारतीय आंब्यांबाबत असे पाऊल उचलले आहे. यापूर्वी 'फ्रुटफ्लाय'च्या प्रादुर्भावामुळे अशीच बंदी घालण्यात आली होती, जी भारताने प्रक्रियेचा दर्जा सुधारल्यानंतर २००६ मध्ये उठवली होती. आता पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे.

'हापूस'सह दिग्गज वाणांची निर्यात ठप्प

एप्रिल ते जून हा काळ भारतीय आंब्यांच्या निर्यातीचा मुख्य आणि अत्यंत महत्त्वाचा हंगाम मानला जातो. मात्र, जपानच्या या निर्णयामुळे यंदा तिथल्या बाजारपेठेतून भारतीय आंबे पूर्णपणे गायब राहणार आहेत. महाराष्ट्राचा जगप्रसिद्ध हापूस (Alphonso), गुजरातचा राजा केशर, उत्तर भारताची शान असलेला लंगडा आणि दक्षिण भारतातील प्रसिद्ध बनगनपल्ली यांसारख्या सर्वच प्रीमियम आंब्यांच्या निर्यातीला जपानच्या सीमेवर रोखण्यात आले आहे. स्वतःच्या देशातील शेती आणि वनस्पतींचे परदेशी कीटकांपासून रक्षण करण्यासाठी जपान प्रशासन कमालीचे सतर्क असते आणि त्यासाठी ते कोणत्याही प्रकारची तडजोड न करता 'झिरो-टोलरन्स' धोरण राबवते, याचाच फटका भारताला बसला आहे.

काय आहे 'VHT' प्रक्रिया?

  • जपानला आंबा पाठवण्यापूर्वी दोन्ही देशांमधील करारानुसार एका विशिष्ट प्रक्रियेतून जाणे बंधनकारक असते, ज्याला 'व्हेपर हीट ट्रीटमेंट' (VHT) म्हटले जाते.
  • ही एक अत्यंत सुरक्षित पद्धत आहे, ज्यामध्ये कोणत्याही हानिकारक रासायनिक औषधांचा वापर केला जात नाही.
  • त्याऐवजी, नियंत्रित उष्णता आणि दमट हवेच्या (बाष्प) साहाय्याने आंब्यांवर प्रक्रिया केली जाते.
  • यामुळे आंब्याच्या आत दडलेले कीटक, त्यांच्या अळ्या आणि फळमाश्या पूर्णपणे नष्ट होतात.
  • जपानच्या कडक नियमांनुसार, या प्रक्रियेचे काटेकोर पालन केल्याशिवाय आंब्याला त्यांच्या देशात प्रवेश मिळत नाही.

तपासणीदरम्यान निष्काळजीपणा उघड

या बंदीची पाळेमुळे मार्च २०२६ मध्ये झालेल्या एका गुप्त तपासणीत आहेत. जपानच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या एका पथकाने उत्तर प्रदेशातील रेहमानपूर येथील 'VHT' प्रक्रिया केंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. या ऑडिटदरम्यान, कीड-नियंत्रण (Pest Control) आणि धुरीकरण (Fumigation) प्रक्रियेत गंभीर तांत्रिक उणिवा आणि व्यवस्थापकीय ढिसाळपणा आढळून आला. दोन्ही देशांच्या सरकारांनी सुरक्षेचा विचार करता या तांत्रिक त्रुटींचे तपशील अधिकृतपणे जाहीर केलेले नाहीत. मात्र, या तपासणीचा थेट परिणाम म्हणून, योकोहामा प्लांट प्रोटेक्शन असोसिएशनने २५ मार्च २०२६ रोजी किंवा त्यानंतर भारताकडून जारी करण्यात आलेली सर्व आंबा तपासणी प्रमाणपत्रे स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

उत्पादक आणि निर्यातदारांना कोट्यवधींचा फटका

भारत हा वार्षिक अंदाजे २८ दशलक्ष मेट्रिक टन आंब्याचे उत्पादन करणारा जगातील आघाडीचा देश आहे. जरी भारताचा बहुतांश आंबा देशांतर्गत बाजारातच खपवला जात असला, तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील गणित वेगळे असते. जपान हा जरी भारतीय आंब्यांचा सर्वात मोठा आयातदार देश नसला, तरी तिथल्या बाजारपेठेत भारतीय आंब्याला 'प्रीमियम' म्हणजेच अत्यंत उच्च दर मिळतो. जपानमधील श्रीमंत ग्राहक हापूस आणि केशरसाठी मोठी किंमत मोजायला तयार असतात, ज्यातून भारतीय शेतकरी आणि निर्यातदारांना मोठा नफा मिळतो. आता ऐन हंगामात ही बाजारपेठ बंद झाल्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी फिरले असून, निर्यातदार आणि बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >