Thursday, May 28, 2026

Nitesh Rane Water Metro : पहिली 'वॉटर मेट्रो' मुंबईत दाखल !

Nitesh Rane Water Metro : पहिली 'वॉटर मेट्रो' मुंबईत दाखल !

मंत्री नितेश राणे यांनी दिली खुशखबर; 'कॅन्डेला पी-१२' बोटीच्या चाचण्यांना जूनमध्ये सुरुवात

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी 'मुंबई वॉटर मेट्रो' आता प्रत्यक्ष रूपात अवतरणार आहे. या वॉटर मेट्रोच्या ताफ्यातील पहिली अत्याधुनिक स्वीडिश इलेक्ट्रिक बोट मुंबई बंदरात दाखल झाली असून, जूनच्या पहिल्या आठवड्यापासून तिच्या मार्गिका चाचण्यांना (ट्रायल्स) सुरुवात होणार आहे. मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी ही खुशखबर दिली.

महाराष्ट्राला लाभलेल्या ८७७ किलोमीटर लांबीच्या विस्तीर्ण किनारपट्टीचा वापर करून राज्यातील जलवाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारकडून वेगाने पावले उचलली जात आहेत. मुंबईच्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी, खड्डे आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी वॉटर मेट्रो हा एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

वॉटर मेट्रोच्या ताफ्यात दाखल झालेली 'कॅन्डेला पी-१२' ही बोट स्वीडनहून मागवण्यात आली असून ती इलेक्ट्रिक प्रपल्शन आणि हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित आहे. ही बोट २५ नॉट्स (सुमारे ४६ किमी प्रति तास) या वेगाने धावणार असून, सध्या प्राथमिक चाचणीसाठी दाखल झालेल्या बोटीची प्रवासी क्षमता ३० इतकी आहे.

'कॅन्डेला पी-१२' बोटीची वैशिष्ट्ये

अत्याधुनिक हायड्रोफॉइल तंत्रज्ञानामुळे ही बोट चालताना पाण्याचा कमीत कमी रोध होतो. परिणामी, ती पाण्याच्या पृष्ठभागावरून तरंगत उडत असल्याचा आभास होतो. ही बोट इतर पारंपरिक डिझेल फेऱ्यांच्या तुलनेत ८० टक्के कमी ऊर्जा वापरते. शून्य कार्बन उत्सर्जन करणारी ही नौका पूर्णपणे प्रदूषणमुक्त आणि आवाजरहित आहे. त्यामुळे समुद्री पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचणार नाही.

पारंपरिक बोटींची जागा आता हायटेक बोटी घेणार

किनारी भागातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बदलण्यासाठी सरकार जागतिक पातळीवरील आघाडीच्या कंपन्यांशी चर्चा करत आहे. या पहिल्या ३० आसनी बोटीच्या यशस्वी चाचणीनंतर, ५० आणि १०० प्रवासी क्षमता असलेल्या आधुनिक बोटी आणण्यासाठी नॉर्वेमधील कंपन्यांशीही बोलणी सुरू असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे आगामी काळात गेटवे ऑफ इंडिया परिसरासह मुंबईच्या किनारपट्टीवर दिसणाऱ्या पारंपरिक लाकडी बोटींच्या जागी अत्याधुनिक, हायटेक आणि पर्यावरणपूरक विद्युत बोटींचे एक नवे आणि देखणे चित्र पाहायला मिळणार आहे. या जलवाहतुकीमुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेळ तर वाचेलच, शिवाय मुंबईकरांना एक सुखकर आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रवासाचा अनुभवही मिळणार आहे.

Comments
Add Comment