Wednesday, May 27, 2026

Nashik News : कश्यपी धरणात पती-पत्नीसह चौघांचा बुडून मृत्यू

Nashik News : कश्यपी धरणात पती-पत्नीसह चौघांचा बुडून मृत्यू

नाशिक : नाशिकच्या कश्यपी धरण (Kashyapi Dam) येथे गेलेल्या पती-पत्नी आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दोघा मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी मयत पती-पत्नी यांची दोन वर्षांची मुलगी ही काठावरच होती. चौघांचा अशाप्रकारे बुडून मृत्यू झाल्याने आणि मृत दाम्पत्याची लेक पोरकी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणात नाशिकच्या हरसुल पोलीस ठाणे (Harsul Police Station) येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय घडली ?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हरसुल पोलीस स्टेशन हद्दीत (Harsul Police Station) असलेल्या कश्यपी धरण येथे नाशिक (Nashik० येथे राहणारे मयत सचिन ठोंबरे (Sachin Thombre) आणि रोहिणी ठोंबरे (Rohini Thombre) हे पती-पत्नी आणि त्यांच्या घराशेजारी राहणारे केतन पवार (वय 17) आणि कौशल पवार (वय 14) हे कश्यपी धरण येथे फिरण्यासाठी गेले होते. यावेळी ते चोघे पाण्यात उतरले त्यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं ते चौघेही बुडाले. ज्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी मयत पती-पत्नी यांची दोन वर्षांची चिमुकली ही काठावरच होती. सुदैवाने ती या घटनेत वाचली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी त्या धरण काठावर पोलिसांना ही चिमुरडी आढळून आली. तिला तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. दोन वर्षाची चिमुकली पोरकी झाल्याने आणि अशाप्रकारे काठावर आढळून आल्याने सर्वानाच धक्का बसला.

घटनेची माहिती मिळताच हरसुल पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. स्थानिक ग्रामस्थ आणि हॉटेल व्यावसायिक यांच्या मदतीने पाण्यात बुडालेल्या चौघांचे मृतदेह हे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. अखेर अथक प्रयत्नानंतर रात्र होण्याआधीच स्थानिकांना चारही मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. त्यांनंतर जिल्हा शासकीय रुग्णालय येथे हे चारही मृतदेह पाठविण्यात आले आहेत.

घटनेबाबत हरसूल पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हरसूल पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे. या घटनेनं संपूर्ण नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आणि मुलांना शाळेला लागलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांकडून धरण परिसरात गर्दी केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि प्रशासनाने देखील अशा घटना घडू नये यासाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >