कानपूर : कर्मचारी निवड आयोगाच्या (Staff Selection Commission) भोंगळ कारभाराचा एक मोठा नमुना कानपूरमध्ये सोमवारी पाहायला मिळाला. SSC-GD कॉन्स्टेबल भरती परीक्षेसाठी एकाच परीक्षा केंद्रावर क्षमतेपेक्षा चक्क दुप्पट उमेदवारांना प्रवेशपत्रे (Admit Cards) देण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला. या ढिसाळ नियोजनामुळे परीक्षा केंद्राबाहेर उमेदवारांचा अक्षरशः महासागर उसळला होता. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून प्रशासनाला तातडीने दोन्ही सत्रांतील (Shifts) परीक्षा रद्द करण्याची नामुष्की स्वीकारावी लागली.
Dhurandhar Production Designer : बॉलिवूडमध्ये खळबळ! नागपूरच्या तरुणीला 'हॉटेलमध्ये बोलावले अन्...; ब्लॉकबस्टर 'धुरंधर' फेम जॉन जोसेफविरोधात बलात्काराची तक्रार
मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. बॉक्स ऑफिसवर तुफान गाजलेल्या 'धुरंधर' (Dhurandar) या चित्रपटाचे प्रोडक्शन डिझायनर (Production ...
क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवेशपत्रे वाटल्याने उडाला गोंधळ
हा संपूर्ण संतापजनक प्रकार महाराजपूर परिसरातील पूर्वमीर येथे असलेल्या 'श्रीमती रामकली इक्बाल बहादूर ऑनलाइन सेंटर'वर (Shrimati Ramkali Iqbal Bahadur Online Centre) घडला. या परीक्षा केंद्राची एका सत्रात केवळ ३९९ विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची क्षमता आहे. मात्र, प्रशासनाच्या अजब कारभारामुळे एकाच सत्रासाठी तब्बल ८१९ विद्यार्थ्यांना याच केंद्राचे प्रवेशपत्र देण्यात आले होते. क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थी केंद्रावर धडकल्याने व्यवस्थापनाची मोठी तारांबळ उडाली.
परीक्षेच्या वेळेत घडला नाट्यमय प्रसंग
पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही परीक्षा सोमवारी दुपारी २ ते ३ आणि सायंकाळी ४.३० ते ५.३० अशा दोन टप्प्यांत पार पडणार होती. दुपारी पहिल्या सत्राच्या वेळेत सुमारे ३५० विद्यार्थी केंद्रात प्रवेश करून आपापल्या जागेवर बसले. मात्र, उरलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना आत जागाच उरली नाही. केंद्राबाहेर विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी आणि रोष पाहून व्यवस्थापनाला आपली चूक लक्षात आली. त्यांनी तातडीने SSC च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर नाइलाजाने या केंद्रावरील दोन्ही सत्रांतील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
संतप्त विद्यार्थ्यांचा चक्काजामचा प्रयत्न
अनेक किलोमीटरचा प्रवास करून आणि पैसे खर्च करून आलेल्या उमेदवारांना परीक्षा रद्द झाल्याचे समजताच त्यांचा संताप अनावर झाला. संतप्त झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी थेट कानपूर-प्रयागराज राष्ट्रीय महामार्गाकडे धाव घेत चक्काजाम करण्याचा प्रयत्न केला. याच वेळी सायंकाळच्या दुसऱ्या सत्रातील विद्यार्थीही केंद्रावर पोहोचल्याने गर्दी आणखीच वाढली. मात्र, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती हाताळली आणि विद्यार्थ्यांची समजूत काढून त्यांना शांत केले. या घटनेबाबत कानपूर पूर्वचे पोलीस उपायुक्त (DCP) सत्यजित गुप्ता यांनी माहिती दिली. ते म्हणाले, "परीक्षा केंद्रावर तोडफोड किंवा हिंसाचार झाल्याच्या बातम्या केवळ अफवा आहेत. पोलीस आणि प्रशासनाने वेळीच पोहोचून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आणि नियंत्रणात आहे."
रद्द झालेल्या परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच SSC च्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केल्या जातील, तसेच उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेलवरही माहिती दिली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांच्या प्रवासाच्या खर्चाचा मुद्दाही संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घालण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.