Petrol-diesel hoarders : पेट्रोल-डिझेल साठेबाजांविरोधात मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर, पुरवठा आणि गृहविभागाकडून संयुक्त कारवाई होणार

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या मोठी वाढ झाली आहे. या वाढीव मागणीचा पुरवठा केला जात असतानाही राज्यात कृत्रिम टंचाईसदृश स्थिती निर्माण केली जात असल्याचे समोर आले आहे. "शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या गरजेचा गैरफायदा घेऊन इंधनाची साठेबाजी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. अशा साठेबाजांवर नागरी पुरवठा आणि गृहविभागाकडून संयुक्तपणे कडक कारवाई केली जाईल," असा अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली.


राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. राज्यातील इंधनाच्या पुरवठ्याची आकडेवारी जाहीर करताना मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या राज्यात पेट्रोलच्या मागणीत सरासरीपेक्षा २३ टक्के, तर डिझेलच्या मागणीत तब्बल ५२ टक्के वाढ झाली असून सरकारकडून त्याचा पुरवठाही केला जात आहे. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये ही वाढ संशयास्पद आहे.


अकोला जिल्ह्यात इंधनाचा खप १५४ टक्क्यांनी वाढला आहे, तर छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, गोंदिया आणि हिंगोली या भागांत ७० टक्क्यांहून अधिक खपत झाली आहे. दुसरीकडे, व्यावसायिक (कमर्शियल) पेट्रोल-डिझेलचा खप मात्र कमी होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी असणारे इंधन व्यावसायिक ठिकाणी वळवून काळाबाजार किंवा साठेबाजी केली जात आहे का? याची सखोल पडताळणी करण्याचे आदेश गृह विभागाला देण्यात आले आहेत.



कांदाप्रश्नी विरोधकांचे अश्रू पुतनामावशीचे


नाशिकच्या चांदवड येथे विरोधकांकडून कांदा प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाचा मुख्यमंत्र्यांनी चांगलाच समाचार घेतला. फडणवीस म्हणाले, "महाविकास आघाडीने केलेले हे राजकीय आंदोलन आहे. कांदा कापल्यानंतरही ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत, अशी मंडळी आज शेतकऱ्यांसाठी पुतनामावशीचे अश्रू ढाळत आहेत. पण, महायुती सरकार शेतकऱ्यांबाबत अत्यंत संवेदनशील आहे. केंद्र सरकारने कालच कांदा खरेदीचा भाव साडेतीन रुपयांनी वाढवून तो १५ रुपयांपर्यंत केला असून मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू केली आहे. विरोधकांनी त्यांच्या काळात कधी एवढ्या भावाने खरेदी केली होती का, ते दाखवावे. केवळ १५ रुपयांवर न थांबता यावर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारला बैठक घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे", असेही त्यांनी सांगितले.



प्रणिती शिंदेंकडून परिपक्वतेची अपेक्षा नाही


काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, "प्रणिती शिंदे या पहिल्यांदाच खासदार झाल्या आहेत. यापूर्वी त्या आमदार होत्या. संसदेत गेलेल्या लोकप्रतिनिधींनी परिपक्वतेने बोलणे अपेक्षित असते. मात्र, कुणी जाणीवपूर्वक अपरिपक्वता दाखवत असेल आणि आपण कुणाबद्दल, काय बोलतोय याचे भान ठेवत नसेल, तर अशा नेत्यांना राज्यातील जनताच त्यांची योग्य जागा दाखवून देईल."

Comments
Add Comment

BMC News : बेस्ट उपक्रमाने, महापालिकेपुढे पसरला शेवटचा हात

बेस्टची समक्षीकरणाच्या दिशेने वाटचाल मुंबई : तोट्यात चाललेल्या बेस्टला (BEST) आर्थिक सक्षम करण्यासाठी

ASHA Workers : राज्यातील ८४ हजार आशा स्वयंसेविकांना मिळणार विमा संरक्षण

प्रस्ताव सादर करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश; आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी, रेशन दुकानातील

BMC : मुंबईतील ओसी (OC) नसलेल्या इमारतींसाठीची ‘अभय योजना’ स्थायी समितीने राखून ठेवली

मुंबई: मुंबईतील ज्या इमारतींकडे भोगवटा प्रमाणपत्र (OC) नाही, त्यांना दिलासा देण्यासाठी प्रस्तावित केलेली 'अभय

BMC News : बांधकामाच्या ठिकाणी असलेली झाडे वाचवणे संबंधित विकासकाची जबाबदारी

लिकिंग रोडवरील झाड दुघर्टनेप्रकरणी महापालिकेत चर्चा दुघर्टनेला विकासकच जबाबदार, प्रशासनाचा दावा मुंबई

BMC :मुंबईतील नोंदणीकृत फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्र; महापालिकेतर्फे वितरण सुरू

मुंबई: मुंबईतील अधिकृत फेरीवाल्यांना कायदेशीर मान्यता देऊन त्यांचा व्यवसाय सुरक्षित करण्यासाठी मुंबई

What to do During Rainy Season : पावसात झाडांखाली थांबू नका, वाहने उभी करू नका, BMC चे नागरिकांना आवाहन

मुुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने पावसाळा पूर्व तयारीच्या कामांमध्ये महानगरातील अतिधोकादायक