Monday, May 25, 2026

Sindhudurg : सिंधुदुर्गातील वाढत्या पर्यटक संख्येचा विचार करून वाहतुकीचे नियोजन करा, पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

Sindhudurg : सिंधुदुर्गातील वाढत्या पर्यटक संख्येचा विचार करून वाहतुकीचे नियोजन करा, पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देशांतर्गत पर्यटनाला मोठी चालना मिळाली असून, सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्हा हा पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात वाढत्या पर्यटक संख्येचा विचार करून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रभावी नियोजन करा, तसेच स्वच्छता आणि पार्किंग व्यवस्थेवर विशेष भर देऊन पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्या, असे निर्देश मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे (Minister Nitesh Rane ) यांनी सोमवारी प्रशासनाला दिले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन सोयी-सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेबाबत मंत्रालयातील त्यांच्या दालनात विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. बैठकीत बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, "सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाचे वरदान लाभले असून, येथे येणाऱ्या पर्यटकांचा ओघ सातत्याने वाढत आहे. ही वाढती संख्या लक्षात घेता, स्थानिक पातळीवर पर्यटकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, याची खबरदारी प्रशासनाने घेतली पाहिजे. विशेषतः सुट्ट्यांच्या कालावधीत होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने योग्य आराखडा तयार करावा. पर्यटनस्थळांच्या ठिकाणी स्वच्छतेवर विशेष भर दिला जावा."

या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अपर पोलीस अधीक्षक नेओमी साटम, जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

गोवंश हत्या आणि अवैध वाहतुकीवर कठोर कारवाई करा

महाराष्ट्र शासनाने गोवंशाची अवैध वाहतूक (Illegal transportation of cattle) , गोहत्या तसेच बेकायदेशीर कत्तलखान्यांवर (illegal slaughterhouses) कठोर कारवाई करण्यासाठी अत्यंत कठोर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात या कायद्याची १०० टक्के आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात सोमवारी महत्त्वाची बैठक पार पडली.

जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत बेकायदेशीर कृत्य खपवून घेतले जाणार नाही, तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे अबाधित राखली पाहिजे, असे आदेश नितेश राणे यांनी पोलिसांना आणि महसूल प्रशासनाला दिले. या बैठकीस जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >