Monday, May 25, 2026

Chandrashekhar Bawankule : भाजप-महायुती विधानपरिषदेच्या सर्व १७ जागा जिंकणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

Chandrashekhar Bawankule : भाजप-महायुती विधानपरिषदेच्या सर्व १७ जागा जिंकणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

- ९९ टक्के जागांवर तिन्ही पक्षांचे एकमत

मुंबई : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती सर्वच्या सर्व १७ जागांवर निर्भेळ यश मिळवेल, असा दावा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सोमवारी केला आहे. महायुतीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. तिन्ही पक्षांचे ९९ टक्के जागांवर एकमत झाले असून, लवकरच उमेदवारांची घोषणा केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. (Chandrashekhar Bawankule)

नागपूर विधानपरिषद पोटनिवडणुकीचा उल्लेख करत बावनकुळे म्हणाले, "नागपूरमध्ये एकूण ८०० मतांपैकी जवळपास ६०० मते एकट्या भाजपकडे आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती मी काँग्रेससह सर्वच पक्षांना केली आहे. ज्या ठिकाणी विरोधकांकडे संख्याबळ जुळत नाही, तिथे उगाच खर्च करण्यापेक्षा निवडणुका बिनविरोध कराव्यात. याबाबत मी स्वतः हर्षवर्धन सपकाळ, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वच प्रमुख नेत्यांना विनंती करणार आहे. निवडणुकांमध्ये लागणारे डिझेल-पेट्रोल आणि पैसा वाचवण्याच्या दृष्टीने सर्वांनीच सकारात्मक प्रतिसाद देणे गरजेचे आहे." (Chandrashekhar Bawankule)

महायुतीच्या जागावाटपाबाबत बोलताना ते म्हणाले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संभाव्य उमेदवारांच्या नावांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली आहे. दिल्लीतील केंद्रीय समिती ज्या दिवशी या नावांवर शिक्कामोर्तब करेल, ती नावे अंतिम होतील. महायुतीमधील जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरला असून ९९ टक्के जागांवर तिन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. (Chandrashekhar Bawankule)

चंद्रपुरातील काँग्रेस नगरसेवक गेले कुठे?

चंद्रपूर आणि गडचिरोलीतील काँग्रेसचे नगरसेवक 'नॉट रिचेबल' असल्याच्या चर्चांवर बावनकुळे यांनी मिश्कील टिप्पणी केली. "काँग्रेसचे नगराध्यक्ष किंवा नगरसेवक कुठे गेलेत, हे शोधण्यास काँग्रेसचे नेतृत्व सक्षम आहे. त्यावर मी बोलणे योग्य नाही," असा टोला त्यांनी लगावला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जय पवार यांना उमेदवारी देण्याबाबतचा निर्णय सुनेत्रा पवार घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Chandrashekhar Bawankule)

काँग्रेस हा जनादेश संपलेला पक्ष : 

- काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करताना ते म्हणाले, "काँग्रेस हा जनादेश संपलेला पक्ष आहे. केवळ नकारात्मकता पसरवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम ते करत आहेत. काँग्रेसने आणीबाणीच्या काळात देशावर कशी हुकूमशाही लादली, याची हजारो उदाहरणे आहेत." - दरम्यान, राज्यातील पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवांवर स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी स्पष्ट निर्देश दिले आहेत. प्रशासनाने योग्य खबरदारी घेतल्यास राज्यात कुठेही इंधनाची टंचाई भासणार नाही. (Chandrashekhar Bawankule)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >