मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; पुढील सहा महिने एकही मोठा सरकारी सोहळा होणार नाही
मुंबई : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेल्या इंधन तुटवड्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व मोठे शासकीय कार्यक्रम पुढील सहा महिन्यांसाठी स्थगित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. "केवळ उपदेशाचे डोस न पाजता नेत्यांनी स्वतः कृतीतून आदर्श ठेवला पाहिजे, तरच तो लोकांपर्यंत पोहोचतो," अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे.
NEET Paper Leak Nashik Connection : नीट पेपर फुटीप्रकरणी आतापर्यंत देशभरात सीबीआयने 6 आरोपींना अटक केली आहे. तर देशभरात अनेक ठिकाणी छापेही टाकण्यात आले आहेत. नाशिकमधून शुभम ...
गुरुवारी विधान परिषदेतील नवनिर्वाचित १० आमदारांच्या शपथविधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चक्क 'बुलेट'वरून विधान भवनात दाखल झाले. त्यांच्या मागे मंत्री आशिष शेलारही स्वार झाले होते. इंधन बचतीचा संदेश प्रतीकात्मक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना 'बिनडोक' आणि 'अप्रगल्भ' म्हणत जोरदार निशाणा साधला. "पंतप्रधानांचे परदेश दौरे हे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि धोरणात्मक दृष्टीने आवश्यक असतात. अशा दौऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे," अशी टीका त्यांनी केली.
पुढील सहा महिने सरकारी कार्यक्रम होणार नसले, तरी शुक्रवारी साताऱ्यात होणारा कार्यक्रम नियोजित वेळापत्रकानुसार पार पडेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. "साताऱ्याच्या कार्यक्रमाचे नियोजन आधीच झाले असून त्यावर खर्चही झाला आहे. या कार्यक्रमाद्वारे २५ लाख कुटुंबांना १० हजार कोटी रुपयांचा लाभ 'प्रधानमंत्री आवास योजने'तून दिला जाणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करणे योग्य नव्हते. मात्र, यानंतर पुढील सहा महिने खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने कोणतेही मोठे सोहळे आयोजित केले जाणार नाहीत," अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
विरोधकांमध्ये प्रगल्भतेची उणीव
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जगातील सर्व देश आज कठोर निर्णय घेत आहेत. पंतप्रधानांनी आपल्याला केवळ थोडासा त्याग करायला सांगितला आहे. यापूर्वी इंदिरा गांधी आणि २०१२ मध्ये पी. चिदंबरम यांनीही असे निर्णय घेतले होते. देशहितासाठी आपण थोडेही जुळवून घेणार नसू, तर ती विरोधकांच्या प्रगल्भतेची उणीव आहे," असा टोलाही त्यांनी लगावला.





