अहिल्यानगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत आणि ‘मेक इन इंडिया’ या दूरदर्शी संकल्पनांना चालना देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये उभारण्यात आलेल्या ऐतिहासिक संरक्षण उत्पादन संकुलांचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत २३ मे रोजी होणार असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि निबे समूहाचे गणेश निबे यांनी दिली.
शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये निबे समूहाच्या माध्यमातून भारतातील खासगी क्षेत्रातील संरक्षण उत्पादनाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा निर्माण होत असल्याचे सांगताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, अत्यावश्यक संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रांसाठी प्रगत उत्पादन क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने शिर्डी येथे डिफेन्स क्लस्टर उभारण्यात येत आहे. ते पुढे म्हणाले की, शिर्डीची भूमी ही भक्ती आणि शक्तीचा अद्वितीय संगम आहे. एका बाजूला श्री साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा संदेश तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्हा संरक्षण उत्पादनाचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून उदयास येत आहे.
कार्यरत होणाऱ्या या प्रकल्पातून सुमारे तीन हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत, शिर्डीसाठी या प्रकल्पाची निवड केल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. निबे उद्योग समूहाचे गणेश निबे यांनी प्रकल्पाची माहिती देताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत संकल्पनेमुळे त्यांच्या स्टार्टअपला मोठी संधी मिळाली. शिर्डी येथील प्रकल्पामध्ये आतापर्यंत एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून भविष्यात ही गुंतवणूक आणखी वाढविण्यात येणार आहे.
अत्याधुनिक संरक्षण प्रणाली : अत्याधुनिक संरक्षण प्रणालींचे डिझाइन, विकास, उत्पादन आणि एकत्रीकरण करणारा निबे समूह हा भारतातील आघाडीचा उद्योगसमूह असून, शिर्डी येथील प्रकल्पातील बॉम्ब शेल उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन तसेच बायो-सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लघु उद्योगांचे सक्षमीकरण : राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, लघु व सूक्ष्म उद्योगांचे सक्षमीकरण, रोजगार निर्मिती आणि पर्यावरणीय जबाबदारी या एकात्मिक दृष्टिकोनातून हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उद्घाटन सोहळ्यानिमित्त देशभरातील विद्यार्थी, उदयोन्मुख अभियंते तसेच लघु व सूक्ष्म उद्योग क्षेत्रातील उद्योजकांना निमंत्रित करण्यात आल्याची माहितीही गणेश निबे यांनी दिली.