विभागाच्या बैठका आता ऑनलाइन; इंधन बचतीसाठी सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
मुंबई : मध्य पूर्वेतील वाढत्या युद्धजन्य तणावामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळीवर ओढवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी तातडीने प्रतिसाद दिला आहे. शेलार यांनी आपला प्रस्तावित 'कान्स' चित्रपट महोत्सव दौरा रद्द केला असून, आपल्या विभागासाठी इंधन बचतीचे तीन महत्त्वाचे निर्बंध लागू केले आहेत. "देशहितासाठी वैयक्तिक प्रलोभने बाजूला सारून शिस्त पाळणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे," असे प्रतिपादन शेलार यांनी यावेळी केले.
मंत्री आशिष शेलार यांनी माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य विभागासाठी सोमवारी नवीन नियमावली जाहीर केली. त्यानुसार, जागतिक चित्रपट महोत्सवासाठी (कान्स) विभागाकडून कोणतेही प्रतिनिधी मंडळ जाणार नाही. प्रवासावरील इंधन खर्च वाचवण्यासाठी उद्यापासून विभागाच्या सर्व बैठकी प्रत्यक्ष न होता केवळ ऑनलाइन स्वरूपात पार पडतील. सरकारी कामकाजासाठी इंधनावरील वाहने टाळून केवळ इलेक्ट्रिक वाहनांचा (ईव्ही) वापर केला जाईल, अशी माहिती शेलार यांनी दिली.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जय पवार यांच्या 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात' या विधानावर भाष्य करताना ...
राहुल गांधींच्या टीकेला प्रत्युत्तर
पंतप्रधानांनी इंधन बचतीसह वर्षभर सोने खरेदी टाळण्याचे जे आवाहन केले, त्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली होती. या टीकेचा समाचार घेताना शेलार म्हणाले की, "राहुल गांधींचे विधान हे त्यांच्या अज्ञानाचा पुरावा आहे. जागतिक संकटाच्या काळात देशहितासाठी केलेल्या आवाहनावर राजकारण करणे दुर्दैवी आहे. देशाला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी आयातीवर मर्यादा घालणे गरजेचे असताना त्यांना केवळ 'पोटदुखी' होत आहे."






