मुंबई : मध्य रेल्वेने मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवासी आणि रेल्वे संचालनाची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी ईएमयू गाड्यांमध्ये सिग्नल लोकेशन अनाउन्समेंट सिस्टीम अपग्रेड करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अत्याधुनिक प्रणालीमुळे मोटरमनना सिग्नलची अचूक माहिती वेळेआधी मिळणार असून, मानवी चुका टाळण्यास मोठी मदत होणार आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्क हे जगातील सर्वाधिक व्यस्त रेल्वे नेटवर्कपैकी एक मानले जाते. या नेटवर्कवर दररोज २ हजार ३०० हून अधिक लोकल गाड्या धावतात. अनेक ठिकाणी सिग्नल फक्त ४०० ते ५०० मीटर अंतरावर असून काही सिग्नल डाव्या किंवा उजव्या टोकाला असल्यामुळे मोटरमनना अत्यंत तणावाखाली काम करावे लागते. ही बाब लक्षात घेऊन ही प्रणाली अधिक सक्षम करण्यात आली आहे.
नवी जीपीएस-आधारित प्रणाली ट्रेनच्या थेट स्थानाच्या आधारे पुढील सिग्नलचा क्रमांक आणि त्याचे स्थान याची ऑडिओ घोषणा करते. सिग्नलपासून ३५० मीटर आणि २५० मीटर अंतरावर असताना मोटरमनना अलर्ट दिला जातो. तसेच ‘पिवळा’ सिग्नल पार केल्यानंतर “काळजी घ्या, पुढचा सिग्नल लाल आहे” असा सतत इशाराही दिला जातो. या प्रणालीमध्ये सर्व मार्गांवरील सिग्नल्सची माहिती, जीपीएस कोऑर्डिनेट्स आणि ऑडिओ रेकॉर्डिंग आधीपासून लोड करण्यात आले आहेत. ट्रेन मॅनेजर प्रवास सुरू करण्यापूर्वी संबंधित मार्ग निवडतो. याशिवाय, पुढील स्टेशनची घोषणाही आगाऊ केली जाते.
या प्रणालीमुळे मोटरमनना रिअल-टाइम सहाय्य मिळणार असून, गाड्यांचे संचालन अधिक सुरक्षित आणि अचूक होणार आहे. तसेच चालकाच्या वेगाचे निरीक्षण, पिवळ्या सिग्नलजवळील हालचाली, प्लॅटफॉर्म एंट्री आणि न्यूट्रल सेक्शनमधील ड्रायव्हिंग पद्धतीचे विश्लेषणही या प्रणालीद्वारे केले जाणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या मते, मुंबई उपनगरीय विभागात ‘Zero SPAD’ म्हणजेच सिग्नल धोकादायक स्थितीत ओलांडण्याच्या घटना पूर्णपणे रोखण्याच्या उद्दिष्टासाठी या प्रणालीचे सुधारणा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.