मुंबई : पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी (३ ऑगस्ट २०२६) संपूर्ण मुंबई शहर शिवभक्तीत चिंब भिजल्याचे पाहायला मिळाले. श्रावणातील पहिल्या सोमवारी भगवान महादेवाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी मुंबईतील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिराकडे धाव घेतली. भल्या पहाटेपासूनच मंदिरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुधाचा अभिषेक, बेलपत्र आणि फुले अर्पण करत भक्तांनी मोठ्या श्रद्धेने महादेवाची पूजा केली आणि 'हर हर महादेव'चा गजर केला.
बाबुलनाथ मंदिरात हर हर महादेवाचा गजर!
#WATCH | Mumbai, Maharashtra: Devotees offer prayers on the occasion of the first Monday of Sawan month.
(Visuals from Shree Babulnath Mandir) pic.twitter.com/zc1DH1GtgF
— ANI (@ANI) August 3, 2026
मुंबईतील अतिशय जुन्या आणि पवित्र मानल्या जाणाऱ्या बाबुलनाथ मंदिरात पहिल्या श्रावणी सोमवारी अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. मंदिराच्या बाहेर भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शिवपिंडीवर दूध, पाणी आणि जलाभिषेक करण्यासाठी लोक अत्यंत उत्साहाने ताटकळत उभे होते. बेलपत्र, फुले वाहून भक्त महादेवाचा आशीर्वाद घेत होते. श्रावण महिन्यात दरवर्षी मुंबई आणि आसपासच्या परिसरातून हजारो नागरिक बाबुलनाथ मंदिरात दर्शनासाठी येत असतात.
श्रावण महिना कधी सुरू होतो?
हिंदू पंचांगानुसार यंदा 13 ऑगस्ट गुरुवार पासून श्रावण महिना सुरू होणार आहे आणि 11 सप्टेंबर 2026 रोजी श्रावण महिना संपणार आहे. श्रावण हा हिंदू दिनदर्शिकेतील दुसरा महिना मानला जातो. या महिन्यात सोमवारचे व्रत करण्याचे विशेष महत्व आहे. त्यामुळे श्रावणी सोमवारला देखील महत्वाचे मानले जाते.
श्रावण सोमवारचे महत्त्व काय आहे ?
हिंदू धर्मातील पंचांगानुसार श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि भगवान महादेवाला समर्पित मानला जातो. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना साधारणपणे जुलै ते ऑगस्ट दरम्यान येतो. या पूर्ण महिन्यात नामस्मरण करणे, उपवास धरणे आणि पूजा-अर्चा करणे अत्यंत शुभ मानले जाते. श्रावणात येणाऱ्या प्रत्येक सोमवाराला (श्रावण सोमवार) विशेष महत्त्व असते, कारण या दिवशी केलेली महादेवाची पूजा लवकर फळास येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
श्रावण सोमवारचा उपवास कसा केला जातो ?
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भक्त उपवास धरतात. या दिवशी भाविक निर्जला किंवा फलाहार करून उपवास करतात. शिवमंदिरात जाऊन शिवपिंडीवर दूध, मध, पाणी, धोतऱ्याचे फूल आणि बेलपत्र वाहिले जाते. ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, श्रावणी सोमवारचे व्रत मनापासून केल्यास घरात सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभते. हे व्रत विशेषतः अविवाहित मुली चांगला आयुष्यमान असणारा पती मिळावा म्हणून करतात (जशी माता पार्वतीने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती). तसेच विवाहित जोडपेसुद्धा आपल्या कुटुंबात सुख-शांती राहावी आणि महादेवाचा आशीर्वाद मिळावा म्हणून हा उपवास मोठ्या श्रद्धेने करतात.