तेलंगणातील सूर्यापेट (Telangana Suryapet) जिल्ह्यातील कोदाड येथे बुधवारी रात्री एक अत्यंत थरारक आणि मन सुन्न करणारी घटना घडली. कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर, एका २४ वर्षीय विवाहित महिलेचा तिच्याच विभक्त पतीने भररस्त्यात पाठलाग करून निर्घृण खून केला. एका चहाच्या टपरीवर लोकांच्या गर्दीतच या माथेफिरू पतीने तिच्यावर चाकूने वार करत तिची जीवनयात्रा संपवली. या दुर्दैवी तरुणीचे नाव शिरीषा असे होते. कोदाड येथेच राहणारा आणि पेशाने ट्रक ड्रायव्हर असलेल्या मनिदीपसोबत तिने सहा वर्षांपूर्वी प्रेमापोटी लग्नगाठ बांधली होती. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते आणि या जोडप्याला एक चार वर्षांचा लहान मुलगाही आहे. मात्र, त्यांच्या सुखी संसाराला अचानक गालबोट लागले.
पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात (Pune Crime News) गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. पुण्यातील चंदननगर (Chandannagar) परिसरात घडलेल्या एका अत्यंत ...
कौटुंबिक छळ आणि घर सोडण्याचा निर्णय
View this post on Instagram
गेल्या वर्षभरापासून त्यांच्या वैवाहिक आयुष्यात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. मनिदीपला दारूचे व्यसन जडले होते. याच दारूच्या नशेत तो शिरीषाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार बेदम मारहाण करत असे. पतीच्या या रोजच्या जाचाला आणि शारीरिक छळाला कंटाळून अखेर पंधरा दिवसांपूर्वी शिरीषाने घर सोडण्याचा कठीण निर्णय घेतला. ती आपला लहान मुलगा घेऊन आंध्र प्रदेशातील जग्गय्यापेट येथे राहणाऱ्या तिच्या मावशीकडे (वेंकम्मा) राहायला गेली. शिरीषाने घर सोडल्यानंतर मनिदीपने थेट कोदाड पोलीस ठाणे गाठले. शिरीषा घरातून जाताना कोणालाही न सांगता आपल्यासोबत काही पैसे घेऊन गेल्याचा आरोप करत त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी समुपदेशनासाठी (काउन्सिलिंग) शिरीषाला कोदाड टाऊन पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.
पोलीस ठाण्यातील अखेरची चर्चा
पोलिसांच्या बोलावण्यावरून बुधवारी संध्याकाळी शिरीषा तिच्या मावशीसोबत पोलीस ठाण्यात हजर झाली. तिथे मनिदीप आणि त्याची आई ज्योती हे देखील उपस्थित होते. पोलिसांच्या मध्यस्थीने त्यांच्यात चर्चा झाली, परंतु शिरीषाने आता कोणत्याही परिस्थितीत नवऱ्याच्या घरी परत न जाण्याचा ठाम निर्णय घेतला होता. आपण हाच निर्णय गुरुवारी लेखी स्वरूपात पोलिसांना देऊ, असे तिने स्पष्ट केले. पोलीस ठाण्यातील सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर शिरीषा आणि तिची मावशी जग्गय्यापेटला परत जाण्यासाठी बाहेर पडल्या. रस्त्यावर उभ्या राहून त्या ऑटो रिक्षाची वाट पाहत होत्या, मात्र त्यांच्यावर काय प्रसंग ओढवणार आहे याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. रात्रीचे साधारण ८.०५ वाजले होते. त्यांना एक ऑटो मिळाली आणि शिरीषा त्यात बसणारच इतक्यात तिथेच दबा धरून बसलेल्या मनिदीपने अचानक तिच्यावर झडप घातली. त्याने तिला अत्यंत क्रूरपणे ऑटोमधून ओढून बाहेर काढले. मनिदीपचा रौद्र अवतार पाहून शिरीषा प्रचंड घाबरली. मनिदीपने जेव्हा आपल्या खिशातून एक धारदार चाकू बाहेर काढला, तेव्हा आपला जीव वाचवण्यासाठी शिरीषाने जवळच्याच एका चहाच्या टपरीकडे धाव घेतली. पण मनिदीप थांबला नाही, तो एखाद्या श्वापदासारखा तिच्या पाठीमागे धावला. त्याने तिला गाठले आणि अत्यंत निर्दयीपणे तिच्या छातीवर व खांद्यावर चाकूने सपासप अनेक वार केले.
उपस्थितांचा हतबलपणा आणि शिरीषाचा अंत
हा सर्व थरार उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा आणि मनिदीपला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. रक्ताच्या थारोळ्यात बुडालेली शिरीषा जागीच कोसळली आणि बेशुद्ध पडली. गर्दीचा फायदा घेत आणि हत्येचे हत्यार तिथेच फेकून देऊन आरोपी मनिदीपने घटनास्थळावरून पळ काढला. आजूबाजूच्या लोकांनी तातडीने शिरीषाला सरकारी रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी रात्री ८.३५ वाजता तिला मृत घोषित केले. या भयंकर घटनेनंतर मृत शिरीषाची मावशी वेंकम्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून मनिदीपवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३ (१) (हत्या) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी शवविच्छेदन (ऑटोप्सी) पूर्ण झाल्यानंतर शिरीषाचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गुरुवारीच आरोपी मनिदीपला अटक करून ताब्यात घेतले आहे.






