Friday, May 8, 2026

DRDO News : भारताची संरक्षण क्षेत्रात मोठी झेप! ओडिशात स्वदेशी ‘TARA’ ग्लाइड शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी

DRDO News : भारताची संरक्षण क्षेत्रात मोठी झेप! ओडिशात स्वदेशी ‘TARA’ ग्लाइड शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी

ओडिशा : ओडिशाच्या किनारपट्टीवर भारताने संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. Defence Research and Development Organisation (डीआरडीओ) आणि भारतीय हवाई दल (Indian Air Force) यांनी संयुक्तपणे टॅक्टिकल ॲडव्हान्स्ड रेंज ऑगमेंटेशन अर्थात ‘टीएआरए’ (TARA) शस्त्र प्रणालीची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी पार पाडली. ही भारताची पहिली स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणाली मानली जात असून, पारंपरिक नियंत्रण प्रणाली नसलेल्या स्फोटकांना अत्यंत अचूक लक्ष्यभेदी शस्त्रांमध्ये रूपांतरित करण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे.

‘टीएआरए’ ही एक मॉड्युलर प्रणाली असून, कमी खर्चात अधिक अचूकता आणि मारक क्षमता मिळवून देण्यासाठी तिची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे पारंपरिक बॉम्ब आणि स्फोटकांचे रूपांतर आधुनिक ‘प्रिसिजन गाईडेड वेपन्स’मध्ये करता येणार आहे. विशेष म्हणजे, शत्रूच्या जमिनीवरील लक्ष्यांवर दूर अंतरावरून अचूक हल्ला करण्यासाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

या अत्याधुनिक प्रणालीची रचना आणि विकास Research Centre Imarat (आरसीआय), हैदराबाद यांनी डीआरडीओच्या इतर प्रयोगशाळांच्या सहकार्याने केला आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि कमी खर्चातील प्रणालींचा वापर करून तयार करण्यात आलेले हे भारतातील पहिले ग्लाइड शस्त्र असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकल्पात ‘डेव्हलपमेंट कम प्रॉडक्शन पार्टनर्स’ (DCPP) तसेच अनेक भारतीय उद्योगांनीही सहभाग घेतला आहे. विशेष बाब म्हणजे, या प्रणालीच्या उत्पादन प्रक्रियेलाही भारतीय कंपन्यांनी सुरुवात केली असून ‘मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भर भारत अभियानाला यामुळे मोठे बळ मिळणार आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी या यशस्वी चाचणीबद्दल डीआरडीओ, भारतीय हवाई दल आणि उद्योग क्षेत्राचे अभिनंदन केले. “भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमतांना बळकटी देणारे हे एक ऐतिहासिक पाऊल आहे,” असे ते म्हणाले.

दरम्यान, संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव तसेच डीआरडीओचे अध्यक्ष समीर कामत (Samir V. Kamat) यांनीही या मोहिमेत सहभागी सर्व वैज्ञानिक, अभियंते आणि तांत्रिक पथकांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, भविष्यात भारतीय सैन्याच्या ऑपरेशनल क्षमतांमध्ये ही प्रणाली मोठी भर घालणार आहे.

संरक्षण तज्ज्ञांच्या मते, ‘टीएआरए’ प्रणालीमुळे भारतीय हवाई दलाला युद्ध परिस्थितीत अधिक सुरक्षित आणि अचूक हल्ले करण्यास मदत होईल. कमी खर्चात विकसित करण्यात आलेली ही प्रणाली भविष्यात निर्यातीसाठीही महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे भारताच्या संरक्षण उद्योगाला जागतिक स्तरावर नवे स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >