Saturday, May 2, 2026

Rahul Narvekar : शिक्षक केवळ वाचायला शिकवत नाही, तर समाज घडवतो आणि वाचवतो" - राहुल नार्वेकर यांचे गौरवोद्गार

Rahul Narvekar : शिक्षक केवळ वाचायला शिकवत नाही, तर समाज घडवतो आणि वाचवतो

मुंबई : "शिक्षक हा केवळ अक्षरांची ओळख करून देणारा घटक नाही, तर तो खऱ्या अर्थाने समाज घडवणारा आणि संकटाच्या काळात समाजाला वाचवणारा शिल्पकार आहे," अशा शब्दांत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकल शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला. मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित 'कर्मयोगी एकल शिक्षक मेळावा २०२६' प्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांसारख्या दिग्गज मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

आपल्या भाषणात नार्वेकर यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीवर भाष्य करताना सांगितले की, भारत आज जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. २०४७ पर्यंत भारताला पूर्णपणे 'विकसित राष्ट्र' बनवण्याचे जे स्वप्न आपण पाहत आहोत, ते पूर्ण करण्यासाठी आपल्या युवा पिढीला 'कुशल युवा' मध्ये रूपांतरित करणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. शिक्षकांमुळेच समाजातील विचार प्रगल्भ होतात आणि कोणताही समाज तोपर्यंत प्रगत करू शकत नाही, जोपर्यंत शिक्षणाची संधी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राहुल नार्वेकर यांनी मानकर ट्रस्टच्या कार्याचे कौतुक करताना मार्टिन ल्यूथर किंग ज्युनिअर यांच्या प्रसिद्ध विचारांचा दाखला दिला. ते म्हणाले की, "मला वाईट प्रवृत्तींच्या हिंसेची भीती वाटत नाही, तर चांगल्या लोकांच्या शांत राहण्याची भीती वाटते." मात्र, मानकर ट्रस्ट आणि त्यांचे एकल शिक्षक शांत न बसता राज्याच्या अतिदुर्गम भागात जाऊन जे सामाजिक परिवर्तनाचे कार्य करत आहेत, ते खरोखरच वंदनीय आहे. समाजातील शेवटच्या स्तरावर असलेल्या आणि मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या आदिवासी बांधवांना शिक्षणाशी जोडणे, हे कार्य खऱ्या अर्थाने 'अंत्योदय' संकल्पना पूर्ण करणारे आहे.

हा भव्य सोहळा आपल्या स्वतःच्या विधानसभा मतदारसंघात पार पडत असल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतुल शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या कार्यामुळे आदिवासी भागातील चित्र झपाट्याने बदलत असून, हा मेळावा आगामी काळात संपूर्ण समाजासाठी एक दीपस्तंभ ठरेल, असा विश्वास राहुल नार्वेकर यांनी यावेळी व्यक्त केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा